सुरक्षा यंत्रणांची माहिती : राज्यात सतर्कतेचे आदेश
नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला असणारा विशेष राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला. म्हणून यासाठी पाकिस्तानने सर्वतोपरी प्रयत्न करून पाहिले परंतू, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. दरम्यान, आता सर्व मार्ग बंद झाल्याचे दिसल्यानंतर पाकिस्तानकडून देशात दहशतवादी कारवाया करण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याच आता काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी होतच असल्याचे संरक्षण यंत्रणांकडून माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, आतापर्यंत काश्मीरमध्ये 40 ते 50 दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचेही सांगण्यात येत आहे.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून दहशतवाद्यांचे लॉंच पॅड वेगाने कार्यरत करण्यात आले असल्याचे भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल केजेएस ढिल्लन यांनी याविषयी माहिती दिली. पाककडून दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याचे प्रशिक्षण देत आहे. तर प्रशिक्षण घेतलेले दहशतवादी भारतात घुसखोरी करण्यासाठी सज्ज असल्याचेही ढिल्लन यांनी यावेळी म्हटले. तसेच ढिल्लन यांनी, आजपर्यंत पाकिस्तानकडून अनेक दहशतवाद्यांना भारतीय लष्कराने घुसखोरी करण्यापासून रोखले असून अनेकांना कंठस्नान घातले आहे. तसेच ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेले शस्त्रास्त्र पाहून पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना देशात मोठा घातपात करण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे म्हटले आहे. तसेच कलम 370 हटवल्यापासून एकही दिवस असा नाही की, दहशतवाद्यांनी घुसखोरी केली नाही. रोज काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून घुसखोरी करण्यात येत आहे. दरम्यान, पाकव्याप्त काश्मीरमधून भारतात आता 300 ते 350 दहशतवादी घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे.