पुणे – यंदा टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणे भरली. धरणे भरल्याने खडकवासला धरणातून मुठा नदीत आतापर्यंत सुमारे 30 टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे.
खडकवासला प्रकल्पातील धरणांमधून शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच या धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्यात येते. त्यामुळे ही धरणे कधी भरतात, याकडे लक्ष लागलेले असते. खडकवासला प्रकल्पाची एकूण क्षमता 29 टीएमसी इतकी आहे. मागील वर्षी सुरुवातीस चांगला पाऊस झाला. त्यावेळी खडकवासला प्रकल्पातून सुमारे 19 टीएमसी इतके पाणी मुठा नदीत सोडण्यात आले होते.तर, यंदा कालव्यातून सुमारे तीन टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. हे पाणी दौंड, बारामती, इंदापूर आणि हवेली या तालुक्यातील शेती व पिण्यासाठी सोडण्यात येत आहे.