नवी दिल्ली – करोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण कशामुळे वाढत आहे याबाबत गेले अनेक दिवस प्रश्न निर्माण होत होते. हायपोक्सियामुळे हे प्रमाण वाढत आहे, असा दावा इंडिया इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसने (आयआयएमएस) केला आहे.
भारतात करोनाबाधितांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. तसेच मृत्यूंचे प्रमाणही वाढत आहे. गेल्या 24 तासांत तब्बल 83 हजारांहून जास्त नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे होणाऱ्या मृत्युंच्या संख्येतील वाढीमुळेदेखील चिंता वाढलीय. वाढत असलेल्या मृत्युंबाबत आयआयएमएसने केलेल्या एका पाहणीतून जे निष्कर्ष समोर आले त्यावरुन हा दावा करण्यात आला आहे.
हायपोक्सियामुळे मृतांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. हायपोक्सिया म्हणजे शरीरातील कोणत्याही एका भागाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. अशा वेळी रुग्णांना देखील कोणतीही लक्षणे जाणवत नाहित. जेव्हा त्यांची लक्षणे स्पष्ट दिसू लागतात तेव्हा मात्र, खूप उशिर झालेला असतो. त्यामुळेच अशा रुग्णांचा मृत्यू होतो.
रक्तात गाठ झाल्यामुळे तसेच ह्रदय आणि फुफ्फुसाला पुरेसे ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे रुग्णांच्या श्वासोच्छवासाचा वेग मंदावतो व त्यातच त्यांचे निधन होते. भारतात याच हायपोक्सियामुळेच रुग्णांच्या मृत्यूचा आकडा वाढलेला दिसत आहे. अशा वेळी रुग्णांना एकाच ठिकाणी ठेवणे महत्वाचे असते. त्यांना कोणत्याही परिस्थितीत चालण्याची परवानगी देणे त्यांच्या जीवाशी खेळ करण्यासारखे असते, असे संस्थेने स्पष्ट केले आहे.