नवी दिल्ली : काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या फेरबदलाची चर्चा सुरू झाली आहे. अशातच काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून वाद सुरु झाला असून पक्षांतर्गत दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना काही वरिष्ठ नेत्यांनी सामूहिक नेतृत्वाची मागणी करणारे पत्र पाठवल्यानंतर गांधी परिवाराशी एकनिष्ठ असलेले निष्ठावान नेते सक्रिय झाले आहेत.
पक्षनेतृत्वाचा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी काही काँग्रेस नेत्यांनी पत्राद्वारे केली आहे. यात महाराष्ट्रातून पृथ्वीराज चव्हाण, मुकुल वासनिक, मिलिंद देवरा या नेत्यांची नावे आहेत. यावर महाराष्ट्राचे दुग्धविकासमंत्री आणि काँग्रेस नेते सुनिल केदार यांनी वरिष्ठ नेत्यांवर टीका केली आहे.
सुनिल केदार म्हणाले कि, आदरणीय सोनिया गांधीजी यांना काँग्रेस अध्यक्ष म्हणून माझे पूर्ण समर्थन आहे. गांधी परिवाराच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या मुकूल वासनिक, पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा यांना लाज वाटली पाहिजे. या नेत्यांनी आपल्या कृतीबद्दल तात्काळ माफी मागितली पाहिजे, असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.
तसेच, माफी मागितली नाही तर या नेत्यांना काँग्रेस कार्यकर्ते या नेत्यांना राज्यात मुक्तपणे फिरु देणार नाहीत. गांधी अध्यक्षपदावर असतील तरच काँग्रेस पक्ष भाजपविरोधात लढू शकतो. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाच्यामागे भक्कमपणे उभे राहण्याची ही वेळ असल्याचे सुनील केदार यांनी सांगितले आहे.