माजी खासदार राजू शेट्टी यांची टीका : शेती प्रश्नांवरही चर्चा
शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीबद्दल मात्र नाराजी
पुणे -“कोल्हापूर जिह्यातून आम्ही भाजप हद्दपार केला असून, सांगली जिह्यात थोडा अवशेष शिल्लक आहे;तो देखील थोड्या दिवसांत हद्दपार करू. मी चंद्रकांत पाटील यांना आव्हान दिले होते, कोल्हापुरात कोठेही निवडणुकीला उभे राहिलात, तरी मी स्वतः तुमच्याविरोधात उभा राहणार आहे. त्यामुळेच त्यांना पुण्याचा आसरा घ्यावा लागला,’ अशी टिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोमवारी केली.
पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने “काश्मीरमधील शेतकऱ्यांचे प्रश्न आणि सद्यस्थिती’ याबाबत समजून घेण्यासाठी शेट्टी यांच्या वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यातील समीकरणाबद्दल शेट्टी म्हणाले, “भाजपला वगळून सर्वपक्षांनी एकत्रीत सरकार स्थापन करावे, अशी जनतेची भावना आहे. परंतु यात सर्वात महत्त्वाची भूमिका कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि शिवसेना या पक्षांची आहे. त्यांच्या चर्चेतून एकमताने जो किमान समान कार्यक्रम तयार होईल, त्यामध्ये शेतकऱ्यांचा मुद्दा महत्त्वाचा असावा, अशी आमची भूमिका आहे.’
राज्यपालांनी शेतकऱ्यांना जाहीर केलेल्या आर्थिक मदतीबाबत शेट्टी म्हणाले, “राज्यपालांनी घाईगडबडीने जी मदत जाहीर केली आहे, ती अतिशय तुटपुंजी आहे. अतिवृष्टीमुळे पिके कुजली आहेत, शेताची साफसफाईसाठीच एकरी किमान 15 ते 16 हजारांपर्यंत खर्च येणार आहे. अशा परिस्थिती ही मदत अत्यल्प आहे. ही मदत केंद्राच्या मदतीमधीलच आहे, का वेगळी आहे. याबाबतदेखील स्पष्टता नाही. म्हणजे ही आधीच्या सरकारच्या धोरणाशी सुसंगत अशी नाही. महापुराच्या काळात राज्य सरकारकडून पूर्ण कर्जमाफी निर्णय करण्यात आला होता. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलेले नाही, त्यांना एनडीआरफच्या तिप्पट भरपाई दिली जाईल. त्याचीही अंमलबजावणी झालेली नाही.
फडणवीस नागपूरला जाणार
निवडणुकीच्या काळात या तीनही पक्षांनी दर, वीज बिल माफी आणि कर्ज माफीसंदर्भात आश्वासने दिली आहेत. किमान समान कार्यक्रमात ते या विषयांवर काय भूमिका घेणार, ते पाहून मग आम्ही ठरवू. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत “मी पुन्हा येईन’ परंतु ते आता पुन्हा नागपूरला जाणार आहेत, असा टोला देखील शेट्टी यांनी लगावला.