नवी दिल्ली : मोबाईल हा सध्याच्या जगात सर्वांच्या जगण्याचा एक अविभाज्य घटक बनलेला आहे. पण सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनमध्ये मोबाईल शॉपवरची बंधने हटली नाहीत तर येत्या मे अखेरीस देशात 4 कोटी लोकांसाठी त्यांचा मोबाईल हँडसेट निरुपयोगी होतील. इंडिया सेल्युलर अँड इलेक्ट्रॉनिक्स असोसिएशन अर्थात आयसीईए या संस्थेने आपल्या अहवालात हा दावा केला आहे.
मोबाईल विक्री आणि दुरुस्तीच्या दुकानांवर निर्बंध असल्याने ही स्थिती ओढवू शकते असा दावा करण्यात आला आहे. सध्या अनेक लोक वर्क फ्रॉम होम करत असल्याने लॅपटॉप, इंटरनेट आधी सुविधांबाबतच्या उपकरणांना लॉकडाऊनमध्ये सवलत देण्यात आली आहे. पण मोबाईलला मात्र ही सूट देण्यात आलेली नाही.
मोबाईल सप्लाय चेनवरची ही बंधने हटवण्यात यावीत यासाठी आपण पंतप्रधानांना विनंती केल्याचेही आयसीईएचे अध्यक्ष पंकज महिंद्रू यांनी म्हटले आहे. सध्या देशात अडीच कोटी हँडसेट हे आवश्यक सेवा मिळत नसल्याने निरुपयोगी ठरत असल्याचा अंदाज या संस्थेच्या अभ्यासात काढण्यात आला आहे.