नवी दिल्ली : रिलायन्स समुहाचे प्रमुख अनिल अंबानी यांनी आपल्यावर असलेला कर्जाचा बोजा फेडण्यासाठी आपल्या दोन वीज कंपन्यांमधील मोठा हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर ब्रुकफिल्ड अॅसेट्स मॅनेजमेंट, ग्रिनको एनर्जी, टोरंट पावर या कंपन्यांसह ८ कंपन्यांनी या व्यवहारात रस दाखवला आहे. त्यामुळे अनिल अंबानी यांनी दिल्लीतील वीज वितरण करणारी कंपनी बीएसईएस आणि यमुना डिस्कॉम्समधील हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स समुहाचा भाग असलेल्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरशी निगडीत असलेल्या या दोन कंपन्यांमधील हिस्सा विकण्यासाठी अत्यांनी केपीएमजीला हायर केलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केपीएमजीला खरेदीदार शोधण्यासह हा व्यवहार पूर्ण करण्याची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे. एका वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
अनिल अंबानी यांनी दोन्ही कंपन्यांमधील ५१ टक्के हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही कंपन्यांचे मिळून सध्या ४४ लाख ग्राहक आहेत. यापूर्वीही त्यांनी आपल्या वीज वितरण कंपनीची विक्री केली होती. त्यांनी आपली रिलायन्स एनर्जी ही कंपनी अदानी समुहाच्या अदानी ट्रान्समिशन लिमिटेडला विकली होती.
२०१८ मध्ये करण्यात आलेल्या या व्यवहारातून अनिल अंबानी यांना १८ हजार ८०० कोटी रूपये मिळाले होते. सध्या अनिल धीरूभाई अंबानी समुहाचा भाग असलेल्या रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरवर मोठ्या प्रमाणात कर्जाचा बोजा आहे. यापूर्वी ब्रिटनमध्ये पार पडलेल्या एका सुनावणीदरम्यान त्यांनी आपलं नेटवर्थ शून्य असल्याचे म्हटले होते.