माहीत आहे ह्याचा अर्थ? ह्याचा अर्थ आहे, “माझ्या सर्व चुकांसाठी मला माफ कर. ‘जैन धर्मात पर्युषण पर्व असते, ह्यात सगळेच एकमेकांना मिच्छामी दुक्कड़म म्हणून एकमेकांची क्षमा मागतात. आत्मशुद्धीसाठी हे क्षमायाचना पर्व असते, ज्यात हात जोडून प्रत्येक जण क्षमा मागते. पण नाही जात काही राग मनातून, नाही जात काही त्रास मनातून.
कधी येतो माणसाला राग, माहीत आहे? आपल्या मनाविरुद्ध घटना घडली, आपल्या मनाविरुद्ध कोणी वागले-बोलले की येतो हा राग. हा राग आपल्यावर इतका प्रभाव करतो की आपण रोजच्या जगण्यात तो जिथे जिथे काढू लागतो. अगदी एखादं नातं तुटण्यापर्यंत हा राग ताणला जाऊ शकतो.
“मिच्छामी दुक्कड़म’ म्हणून आपणसुद्धा का नाही सर्व राग मनातून काढून टाकून क्षमा मागत? नाही, नाही मागत आपण क्षमा, कारण इथे आड येतो आपला अहंकार.
अगदी आई-मुलगीपासून मित्र-मैत्रिणी ते ऑफिसमधील बॉसपर्यंत हा रागाचा प्रवास असतो. कधी आपणही चुकलेले असतो, पण अहंकारामुळे, हट्टीपणामुळे डोळ्यांवर पट्टी बांधलेली असते आणि “आपणच बरोबर आहोत,’ ही खोटी भावना बळावली जाऊन आपण कुणालाही “सॉरी’ म्हणायला तयार नसतो. अनेक नाती अशी असतात की, जिथे वाईटपणा घेऊनसुद्धा, आपली चूक नसतानासुद्धा ते नातं सांभाळण्यासाठी मान झुकवावी लागते; माफी मागावी लागते.
क्षमा मागणे आणि माफ करून टाकणे दोन्ही खूप मोठे गुण आहेत. माणसाने क्षमा मागितल्यावर त्याचा अहंकार संपतो आणि माफ केल्यावर संस्कार दिसतो. गांधीजी म्हणतात की, क्षमा करणारी व्यक्ती ही शक्तिशाली-सामर्थ्यवान असते, कारण त्यासाठी मोठं मन लागतं, जे क्षमा करणाऱ्याकडे असतं.
माणूस आहे तर चुका या होणारच, पण चूक झाल्यावर क्षमा मागणे म्हणजेच माणुसकी बाळगणे, असे मी म्हणेन. एखादा माणूस चुकतो, तो काही मुद्दाम चुकतो असंही नाही ना? त्या वेळची परिस्थिती, मानसिक स्थिती वगैरे ध्यानात घेता, तो जे वागला ते योग्य की अयोग्य? किंवा आपण त्या जागी असतो तर आपण कसे वागलो असतो, हा विचार करूनच त्या माणसाबद्दल राग धरावा.
त्या माणसाला चूक मान्य असेल, तर मोठ्या मनाने त्याला माफ करून टाकावे. हे माफ करणं इतकं सुंदर असतं की, समोरच्या माणसाच्या चेहऱ्यावर आणि आपल्या मनात आनंद निर्माण करतं आजकाल कुठल्याच माणसाचा जगण्याबाबत भरवसा देता येत नाही.
आयुष्य इतकं अशाश्वत झालं आहे की, हे राग, लोभ, एखाद्या बद्दल आकस धरून ठेवणं फार चुकीचं असतं. पण होतं काय की माणसात एक पुरेपूर अवगुण वास करत असतो, जो त्याचा शत्रू असतो, त्याला चांगलं करण्यापासून रोखत असतो, तो म्हणजे अहंकार! या अवगुणावर तुम्ही जर विजय मिळवलात ना, तर माणूस म्हणून जगतानाची अर्धी लढाई तुम्ही जिंकलीत.
हे नेहमीच लक्षात ठेवलं पाहिजे की, समोरचा चुकला, तशी चूक आपल्याही हातून घडू शकते, आपण काही 100% कधीच बरोबर नसतो ना? तर माफी मागणे आणि माफ करणे म्हणजे एकप्रकारे मनःशांती, विचारांची शुद्धी असते जी प्रत्येकाने बाळगायला हवी आहे. राग मनात धरून, नातं काय एका मिनिटात तुटू शकतं. पण जुळायला पूर्ण जन्मसुद्धा कमी पडतो.
काही चुका अक्षम्य असतात, ज्या माफीच्या लायक नसतात; पण केवळ माणूस नको तुटायला, नातं नको संपायला म्हणून त्या चुका त्या माणसासकट स्वीकारून जीवनभर त्याला आपण साथ देत असतो. आणि असा माणूस देवापेक्षा नक्कीच कमी नाही, जो माणुसकीला जवळ बाळगून असतो. कारण “चुका करणारा हा माणूस आणि माफ करणारा हा देव असतो.’ आपल्याला देवत्व असलेलं आयुष्य जगायचं आहे, पण माणूस म्हणून. शेवटी इतकंच म्हणेन…
बाळगावी क्षमा,
सदाची मनात
देवत्व देहात,
जीवनी ह्या
मानसी चापेकर