श्रीनगर: काश्मीरात सुमारे 70 दिवसांच्या अवधीनंतर पोस्टपेड मोबाईल सेवा सुरू करण्यास सरकारने अनुमती दिल्यानंतर काही तासातच पुन्हा या मोबाईलवरील एसएमएस सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या मोबाईल फोनवर इंटरनेट सेवा अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. तशातच आता एसएमएस सेवाही बंद करण्यात आल्याने फोन सेवा सुरू होऊनही त्याचा मोठा लाभ घेणे या भागातील नागरीकांना अद्याप शक्य झालेले नाही.
काल दहशतवाद्यांनी काश्मीरात एका राजस्थानी ट्रक चालकाची हत्या केली तसेच एका फळबाग मालकावर हल्ला करण्याची घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी सरकारच्या कलम 370 च्या निर्णयाच्या विरोधात बंद पाळण्याचा आदेश दिला आहे. दुकाने अथवा अन्य व्यवहार सुरू करणाऱ्यांवर हल्ले केले जात आहेत.
काश्मीर खोऱ्यात फळांचा हंगाम सध्या जोरात सुरू आहे. त्याच्या वाहतुकीला अडथळा आणण्यासाठीही दहशतवाद्यांकडून तेथे हल्ले चढवले जात आहेत. या पार्श्वभूमीवर मोबाईल फोन सेवेचे दुरूपयोग दहशतवादी संघटनांकडून केला जाऊ नये यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.