वांसदा (गुजरात) – केंद्रीय मंत्री आणि भाजपा खासदार स्मृती इराणी यांनी आज मंगळवारी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाना साधला आहे. त्यांनी राहुल गांधी यांना, गुजरातमधील छोटे चहावाल्यांच्या खिशातून पैसे काढण्याचे आणि राज्यातून निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे.
त्यांनी कॉंग्रेसवर आरोप केले आहे की, गुजरातच्या लोकांविषयी कॉंग्रेसचे धोरण नेहमीच पक्षपाती राहिले आहे. राहुल गांधी आणि कॉंग्रेसने गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेलांच्या ‘स्टॅच्यू ऑफ यूनिटी’लासुद्धा विरोध केला होता.
आसाममध्ये एका रॅली दरम्यान राहुल गांधी यांनी गुजरातमधील चहावाल्यांच्या खिशातून पैसे काढणार असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याचा समाचार घेताना इराणी म्हणाल्या की, कॉंग्रेसला आतापर्यंत चायवाला (पंतप्रधान नरेंद्र मोदी) विषयी दुखणे होते आता त्यांना चहा पिणाऱ्यांविषयी दुखणे निर्माण झाले आहे.
महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटले की, ‘मी राहुल गांधी यांना खुले आव्हान देत आहे की, त्यांच्यात साहस असेल तर त्यांनी गुजरातमधून निवडणूक लढवावी. त्यामुळे त्यांचे सर्व गैरसमज दूर होतील.’
राहुल गांधी यांनी आसाम रॅलीत म्हटले होते की, कॉंग्रेसची आसाममध्ये सत्ता आली तर चहाच्या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या मजुरांची मजुरी वाढवण्यात येईल.
गुजरातमध्ये 81 नगरपालिका, 31 जिल्हा परिषदांसाठी 28 फेब्रुवारीला निवडणूक होणार आहे.