नवी दिल्ली – लोकसभेत कॉंग्रेसच्या खासदारांनी भाजपा महिला सदस्यांसह गैरवर्तन केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी सोमवारी केला. हा विषय आपण लोकसभेच्या सभापतींकडे उपस्थित करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दिल्लीतील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधी सदस्यांनी लोकसभेत तीव्र निषेध केला. त्यानंतर भाजप आणि कॉंग्रेसच्या सदस्यांमध्ये धक्काबुक्की झाली. “कॉंग्रेसच्या खासदारांनी लोकसभेत भाजपच्या महिला खासदारांशी गैरवर्तन केले. त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करावी असे आपण सभापती ओम बिर्ला यांना सांगणार असल्याचे इराणी यांनी संसदेच्या बाहेर पत्रकारांना सांगितले.
गेल्या दोन ते तीन सत्रापासून कॉंग्रेसचे गुंड सदस्य संसदेच्या कामकाजात अडथळा आणत आहेत, संसदेत कॉंग्रेस सदस्यांच्या या कृत्यावरून गांधी घराण्याची निराशाच दिसून येते, असेही त्या म्हणाल्या.
तत्पूर्वी भाजपाच्या एका महिला खासदाराने मारहाण केल्याची तक्रार कॉंग्रेसच्या खासदार रम्या हरिदास यांनी भाजपचे सभापती बिर्ला यांच्याकडे दाखल केली होती. या बाबत त्वरित कारवाई करण्याची मागणीही हरिदास यांनी केली.