सध्या निसर्गानं जणू मानवजातीवर सूड उगवायचं ठरवलं आहे, असं वाटत आहे. बहुतेक सर्व शहरांत आणि प्रमुख गावांत अतोनात वृष्टी होऊन पाणी साठल्यामुळे प्रलयासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. एका टीकाकारानं तर पाणीच पाणी चहुकडे… या गाण्याचं …गेलं शासन कुणीकडे असं विडंबन केलं आहे.
आता तर प्रलयासारखी परिस्थिती वारंवार निर्माण होते आहे. हे आणखी मोठ्या प्रमाणात आणि वारंवार होण्याची लक्षणं दिसत आहेत. पण यावर उपाय काय? हा प्रकार बघून साश्चर्य उद्विग्नता येते. त्याचं कारण असं आहे की, या समस्येचं नक्कीच निराकरण करता येऊ शकतं. त्यासाठी नवकल्पना आणि जबर इच्छाशक्ती यांची गरज आहे. मुळात एवढ्या प्रचंड प्रमाणात पाणी साठतं, नागरिकांचं जीवन उद्ध्वस्त करतं आणि नंतर काही काळानं गटारं, ओढे, नाले यांच्याद्वारे नदीत जाऊन शेवटी समुद्राला जाऊन मिळतं हे सगळंच वेदनादायक आहे.
पाणी हे अतिशय मौल्यवान संसाधन आपल्या डोळ्यासमोर आपल्याला व्यथित करून संपूर्णपणे वाया जातं. हे पाहिलं की सॅम्युएल कोलरिज याच्या कवितेतील “वॉटर, वॉटर एव्हरीव्हेअर अँड नॉट अ ड्रॉप टु ड्रिंक’ या ओळींची आठवण होते. एवढ्या प्रचंड जलाशयाचा काहीही उपयोग होऊ नये? काही जण म्हणतील, नदीचं पाणी धरणात अडवलेलं असल्यानं ते काही वाया जाणार नाही. पण हे सर्वस्वी चूक आहे कारण हा प्रकार शहरात होतो. शिवाय तिथल्या “कॅचमेंट एरिया’मधून आलेलं पाणी धरणात अपेक्षेपेक्षा जास्त साठलं तर ते सोडून दिलं जातं- म्हणजे शेवटी वायाच जातं!
नद्यांमधून उपयुक्त पाणी वाहून जाऊन समुद्राला मिळतं आणि थेट उपयोगाला येत नाही हे सहस्रावधी वर्षे पाहत असूनसुद्धा माणूस या बाबत बंधारे आणि धरणं बांधण्याशिवाय काही करू शकला नाही याचं आश्चर्य वाटतं. यामुळे पूर येवो अथवा न येवो पाणी वायाच जात असतं-कायमच. धरणं बांधल्यामुळे काही प्रमाणात फायदा झाला असला तरी काही भागांत नद्या कोरड्या पडण्याचं तेच कारण आहे. म्हणजे काही ठिकाणी पाण्याचा प्रचंड मारा आणि इतर ठिकाणी दुर्भिक्ष!
निरंतर पूरस्थिती निर्माण करणाऱ्या नद्यांच्या पात्राच्या बाजूला पूररेषेच्या आत मोठ्या व्यासाचे पाइप खोलवर टाकून पुराचं पाणी जमिनीत जिरवता येऊ शकेल. भूजलाच्या पातळीमध्ये गंभीर घट झालेली असताना त्यात यामुळे सुधार होईल आणि पुरामुळे होणारी जीवित आणि वित्तहानीही बऱ्याच प्रमाणात कमी होईल. मुख्य म्हणजे धरणासारख्या महाखर्चिक योजनांपेक्षा अतिशय कमी खर्चात जलसंवर्धन होईल.
निसर्गाचा समतोल राखल्यानं पर्यावरणाचं शुद्धीकरण होईल आणि परिणामांच्या शृंखलेमुळे कदाचित जागतिक तापमानवृद्धीला काहीसा आळा बसू शकेल. यातून एवढंच सुचवायचं आहे की पेटीच्या बाहेर (आउट ऑफ द बॉक्स) विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. प्लॅस्टिक कचऱ्याची विल्हेवाट रस्ते-बांधणीसाठी करून समस्येचं अंशत: का होईना निराकरण झालेलं आहे. त्यामुळे पेटीबाहेरील कल्पना यशस्वी होऊ शकतात हे नक्की.
श्रीनिवास शारंगपाणी