जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आत्महत्येला सर्वाधिक प्राधान्य असलेली सामाजिक समस्या मानते. दहा सप्टेंबर हा “जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिवस’ म्हणून पाळला जातो. भारतीय केंद्रीय गृहमंत्रालयातील “नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो’ या विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षांत सुमारे सहा लाख भारतीय नागरिकांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी सुमारे एक लाख शेतकरी होते. ही आकडेवारी गेल्या पाच वर्षातली असली तरी या सर्व समस्यांची सुरुवात अनेक वर्षांपूर्वी झाली आहे. अलीकडे या समस्येचं प्रमाण वाढलं आहे इतकंच.
सासरचा छळ असह्य होऊन विवाहितेने आत्महत्या केल्याच्या बातम्यांची तर आपल्याला सवयच झाली आहे. एका चौदा वर्षांच्या हुशार मुलीला गणिताचा पेपर अवघड गेला म्हणून निकालाच्या आधी दोन दिवस तिने आत्महत्या केली. दुसऱ्या एका तेरा वर्षांच्या मुलाने ऑनलाइन गेममध्ये चाळीस हजार रुपये गमावल्याने आत्महत्या केली.
भारतात 2017 ते 2019 या कालावधीत 14 ते 18 या वयोगटातील 24 हजार 568 मुलांनी आत्महत्या केल्याचे “नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो’च्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात म्हटले आहे.
वाईट याचं वाटतं की, आत्महत्या करणाऱ्यांमध्ये आपल्याला अन्नधान्य पुरवणारा, आपल्याला जगवणारा शेतकरी आहे. भारतातील विद्यार्थ्यांचं प्रमाणही फार मोठं आहे. गेल्या पाच वर्षांत चाळीस हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. म्हणजे भारतीय लोकांना जगवणारे आणि भारताचे भवितव्य घडवणारे सगळ्यात जास्त मृत्युमुखी पडत आहेत.
या प्रकारचे मृत्यू आपली शिक्षणपद्धती, ग्रामीण अर्थनीती, सामाजिक स्वास्थ्य कसं आहे हे दाखवून देतात. पण हे कटू वास्तव आपण पाहतदेखील नाही. राजकीय नेते व जनता हे सारे धर्म, जाती, नेत्यांचे वैयक्तिक गुण-दोष यांवर चर्चा करण्यातच मश्गुल आहेत.
आत्महत्येचा विचार मनात येण्यामागे मुख्यतः तीन कारणे असतात. एक म्हणजे भीती, दुसरे म्हणजे पर्यायच शिल्लक नाही असे वाटणे आणि तिसरे म्हणजे संवाद नसणे. करोनाचे दुष्टचक्र सुरू झाल्यानंतर आयुष्य संपवण्याकडे लोकांचा कल अधिकच वाढला. गेल्या अडीच वर्षात कौटुंबिक हिंसाचार, आर्थिक अडचण, बेरोजगारी, व्यसनाधीनता, प्रेमभंग अशा विविध कारणांमुळे या आत्महत्या होत आहेत. जेव्हा एक व्यक्ती आत्महत्या करते, तेव्हा ते कुटुंबच उद्ध्वस्त होत असते.
खरं तर कोणतीही आत्महत्या करणारी व्यक्ती तिला जगायचं नसतं म्हणून आत्महत्येचा मार्ग निवडत नाही; तर आता आपण जगण्यासारखी परिस्थितीच उरलेली नाही असं तिला वाटतं आणि म्हणून ती जगणं संपवते. आपली समस्या सुटण्यासारखी नाही अशी खात्री पटल्यावर आपण स्वतःलाच संपवू म्हणजे समस्याही संपेल अशा अगतिक अवस्थेतून ती मृत्यूला कवटाळते. जगातील आत्महत्या करणाऱ्या स्त्रियांमध्ये एक तृतियांश स्त्रिया भारतातल्या असतात. खरं तर स्त्रिया सहजासहजी धीर सोडत नाहीत. पण त्यांना पुरेसा मानसिक आधार देण्यास कुटुंबीय व समाज कमी पडतो.
आत्महत्या करणाऱ्या व्यक्ती काही मूर्ख, आततायी नसतात. त्यांनाही जगायचं असतं. पण प्रत्येकाच्याच आयुष्यात असा एखादा क्षण येतो की, बस् झालं आता, संपवून टाकावं सगळं; असा विचार प्रबळ होतो. त्या क्षणापासून त्याला मागे खेचण्याचं काम आपण आजूबाजूच्यांनी करायला हवं. आत्महत्येस प्रवृत्त झालेल्या व्यक्तींना मानसिक समुपदेशन करून त्या विचारापासून परावृत्त करणे शक्य आहे; पण सगळ्याच व्यक्तींना अशा समुपदेशकांपर्यंत पोहोचणे शक्य नसते. म्हणून आपणच हे काम करायला हवे. त्यांना जगावंसं वाटेल असा विश्वास त्यांच्या मनात जागा करायला हवा.
जीव देणाऱ्याच्या मनात कधीही एकच कारण नसतं. एकेक प्रतिकूल गोष्ट मनात साचत जाते. सगळीकडून कोंडी होत जाते. अशा वेळी एखादा प्रसंग, घटना शेवटची काडी ठरते. तिथे त्या व्यक्तीची सहनशक्ती संपते आणि त्या निराशेच्या झटक्यात ती आत्महत्या करते. ह्या शेवटच्या क्षणापर्यंत ती व्यक्ती पोचण्यापूर्वीचा वेळ आपण ओळखला पाहिजे, वापरला पाहिजे. अशा व्यक्तीला बोलतं करून जवळच्यांनी ते आपुलकीनं ऐकून घ्यायला हवं.
कोणतीही व्यक्ती अचानक काहीतरी मनात येतं आणि ती जीव देऊन मोकळी होते असं होत नाही. तिच्या वागण्याबोलण्यातून तसे पूर्वसंकेत मिळत असतात. बऱ्याच व्यक्ती जीव देऊन टाकावा असं बोलूनही दाखवतात. तेव्हाही काही वेळा त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. वेळीच जर हे निराशेचे कोंब खुडून टाकले, त्यांच्याशी सतत संवाद ठेवला, प्राप्त परिस्थिती समजावून घेऊन काही मार्ग काढण्याचे प्रयत्न केले तर अशी व्यक्ती आत्महत्येच्या खाईपर्यंत पोचणार नाही. आपल्या सोबतीला कुणीतरी आहे, सगळेच काही संपलेले नाही असा दिलासा त्यांना वाटेल.
काही वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न फसतो. अशा लोकांनादेखील मानसिक आधाराची गरज असते. अशा कृतीसाठी त्यांना अजिबात दोष न देता त्यांचा जीव आपल्याला किती मोलाचा आहे याची जाणीव त्यांना करून द्यावी. “आता मी तुझ्याबरोबर आहे, स्वतःला एकटे मानू नकोस’ असा भरंवसा त्या व्यक्तीच्या मनात निर्माण झाला पाहिजे. मनाचे खेळ विचित्र असतात. ते सगळेच आपल्याला समजतात असे नाही; म्हणून अस्वस्थ, उदास मानसिक स्थिती असलेल्या व्यक्तींना प्रशिक्षित मानसोपचारतज्ज्ञाकडे जरूर घेऊन जावे.
उपचार पूर्ण करावेत. त्याला आवडतील अशा गोष्टी करण्यास त्याला प्रोत्साहन द्यावे. खेळ, संगीत, गप्पा, मोकळ्या हवेत फिरणे अशा साध्यासाध्या गोष्टींमुळेदेखील हे निराशेचे सावट दूर होऊ शकते. आपला देश निरोगी, सुखी व्हावा ही इच्छा असेल तर सरकार व आपण जनता सर्वांनीच त्यासाठी मनापासून प्रयत्न करायला हवेत.
माधुरी तळवलकर