लहानपणी मी खूप खूप गोष्टी ऐकल्या. आजीकडून सर्वात जास्त गोष्टी ऐकल्या. त्याखालोखाल आईकडून, मामाकडून आणि शाळेत शिक्षकांकडून. अर्थात प्रत्येकाच्या गोष्टींचे विषय वेगळे वेगळे असायचे. त्यांची सांगण्याची वेळ वेगळी असायची आणि सांगण्याची पद्धतही वेगळी असायची. पण सर्वात जास्त आवडायच्या त्या आजीच्या गोष्टी.
आजीच्या बहुतेक गोष्टी या रात्री जेवण झाल्यानंतर, भावंडांबरोबर आजीच्या अवतीभवती अंथरुणावर बसून किंवा आजीच्या मांडीवर डोके ठेवून, केसातून तिचा मायेचा हात फिरत असताना ऐकल्या आहेत. आज आजी नसली तरी आजीच्या त्या जुन्या गोष्टी कधी कधी पुन्हा ताज्या होतात. आजच्या परीस्थितीत त्यांचे वेगळे अर्थ जाणवतात.
आज मला आठवते ती परीक्षित राजाची गोष्ट. परीक्षित राजा म्हणजे महापराक्रमी वीर धनुर्धर पांडव अर्जुनाचा नातू. अर्जुनपुत्र अभिमन्यू आणि उत्तराचा पुत्र. अश्वत्थाम्याने तो गर्भात असतानाच ब्रह्मास्त्र सोडून त्याचा वध केला होता. पुढे श्रीकृष्णाने त्याला जिवंत केले अशी कथा.
तर या परीक्षित राजाने कोणा ऋषींची चेष्टा करायची म्हणून त्यांच्या गळ्यात मेलेला साप हारासारखा अडकवला. आणि निघून गेला.
ऋषी समाधी अवस्थेत असले तरी त्यांच्या गळ्यात अडकवलेला साप पाहिला. संतप्त होऊन त्यांनी शाप दिला की, ज्याने हे कृत्य केले आहे, त्याला सात दिवसांत सर्पदंशानेच मृत्यू येईल आणि हा सर्प कोणी साधासुधा नाही, तर तक्षक!
ही शापवाणी ऐकून राजा परीक्षित भयभीत झाला. ऋषींच्या शापानुसार सापाच्या दंशापासून बचाव करण्यासाठी त्याने एक अत्यंत बारीक जाळीचा पिंजरा बनवून घेतला. असा पिंजरा की, ज्यात सापच काय, पण अगदी सूक्ष्म किडासुद्धा जाऊ शकणार नाही. कोणत्याही सापापासून सुरक्षित अशा त्या पिंजऱ्यात सात दिवस राहिल्यानंतर ऋषींचा शाप विफल होईल. मग आपण बाहेर येऊन सुरक्षितपणे जगू शकू असा विचार त्याने केला आणि तो पिंजऱ्यात जाऊन बसला.
सहा दिवस गेले. या काळात राजाला सर्पदंश न होता तो सुरक्षित राहिला. जाणाऱ्या प्रत्येक दिवसागणिक राजाची भीती कमी कमी होत होती. आता एकच दिवस राहिला. तो शेवटचा सातवा दिवस उजाडला. मावळतीलाही आला. सूर्यास्ताला काही क्षणच राहिले होते. ऋषींच्या शापापासून आपण आता बचावलो या भावनेने राजा सुरक्षित आणि काहीसा बेफिकीरही झाला. त्याला भूक लागली होती.
खाण्यासाठी त्याने काही फळे मागवली. सर्व फळे अगदी कडक तपासणी करून पिंजऱ्यात बसलेल्या राजाला देण्यात आली. राजाने एक फळ घेतले, अगदी छोटेसे बोर होते ते. बोराचा चावा घेऊन त्याचा एक तुकडा खाल्ला आणि उरलेल्या बोरातून एक छोटी अळी बाहेर पडली. बाहेर पडताच बघता बघता वाढून तिचे रूपांतर मोठ्या नागात-तक्षकात झाले. त्याने परीक्षित राजाला दंश केला आणि ऋषींचा शाप खरा झाला. राजा सर्पदंशाने मरण पावला.
गंमत म्हणून सहा दशकांपूर्वी ऐकलेली ही कथा आजच्या परिस्थितीत एक वेगळाच संदेश देऊन जाते. राजाच्या वाईट वागण्यानेच त्याच्या मागे शापाचे शुक्लकाष्ट लागले. स्वत:ला वाचवण्याचा त्याने खूप प्रयत्न केला. पण “होनी’ तर कोणी टाळू शकत नाही. पण काहीही असले तरी बचावासाठी शक्य असलेले सर्व प्रयत्न करत राहिले पाहिजे. केलेच पाहिजेत हे महत्त्वाचे. या गोष्टीचा संबंध आजच्या करोनाशी लावता येईल.
राजाच्या केलेल्या दुष्कृत्याप्रमाणेच आजच्या मानवजातीच्या अविवेकीपणामुळे पुष्कळ संकटे आजवर उद्भवली आहेत. करोना हे त्यातीलच एक. त्यापासून बचावासाठी परीक्षित राजाच्या पिंजऱ्याप्रमाणे मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्सिंग यांचा सुरक्षा पिंजरा आहे. पण नियमांचे पालन न करून आपण करोनाला लाडावून ठेवत आहोत, पसरवत आहोत ही गोष्ट अजूनही आपल्याला समजली तरी उमजत नाही.
अनुराधा पवार