राजधानीत सुरू असलेल्या विश्वकरंडक नेमबाजी स्पर्धेत भारताचे भविष्य बनलेल्या कोल्हापूरच्या राही सरनोबतने आपली गुणवत्ता सिद्ध केली. या स्पर्धेत राहिला संमिश्र यश मिळाले असले तरीही तिने आगामी काळात होत असलेल्या स्पर्धांमध्ये पदकांची दावेदारी देखील मिळवली आहे. राहिने या स्पर्धेत 50 मीटर रायफल 3 पोझिशन प्रकारात रजत पदकाला गवसणी घातली. तिचे सुवर्णपदक जरी हुकले असले तरीही तिच्या कामगिरीमुळे अत्यंत मानाच्या या स्पर्धेत देशाशी शान उंचावली आहे. आता येत्या काळात जागतिक स्तरावर राहीचे वर्चस्व तर सिद्ध होईलच; पण तिला टोकियोतील ऑलिम्पिक पदकही खुणावत आहे.
राहीच्या आजवरच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर तिच्यातील प्रगती थक्क करणारी आहे. मूळ कोल्हापूरची असलेली अव्वल नेमबाज राहीने एशियाडमध्ये चमत्कार घडवला. या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक मिळवणारी राही भारताची पहिलीच महिला नेमबाज ठरली. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके मिळवलेल्या राहीने या सुवर्ण पदकासह आगामी टोकीओ ऑलिंपिकसाठी आशा पल्लवित केल्या आहेत.
2006 मध्ये तेजस्विनी सावंत हिने नेमबाजीत राष्ट्रीय पदक मिळवले होते. त्यावेळी कोल्हापूरमध्ये तिची जंगी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यावेळी राही या मिरवणुकीत सर्वप्रथम तेजस्विनीला भेटली. या भेटीमुळे राही इतकी प्रभावीत झाली की आपणही तेजस्विनीप्रमाणेच नेमबाजी करावी आणि देशाचे प्रतिनिधित्व करावे अशी स्वप्नही पाहू लागली, त्यावेळी ती केवळ दहावीत होती. वडील जीवनराव आणि आई प्रभा यांना राहीने विज्ञान शाखेची पदवी घ्यावी असे वाटत होते मात्र, पदवीपेक्षा आंतरराष्ट्रीय पदके मिळवणे हेच राहीचे ध्येय होते. 2008 पासून अजित पाटील यांच्याकडे संभाजी राजे क्रीडा संकुलात नेमबाजीचा सराव सुरू केला. त्यानंतर आद्ययावत सरावासाठी ती पुण्यात लक्ष्य या संस्थेत दाखल झाली. त्याच वर्षी पुण्यात झालेल्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत तिने कारकिर्दीतील पहिलेवहिले पदक जिंकले. त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. आजमितीला जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मिळून शेकडो पदके तिने मिळवली आहेत. 2017 साली दुखापतीमुळे तिला ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत खेळता आले नाही. परिणामी तिची संधी हुकली. आता एशियाडमधील मिळविलेल्या पदकामुळे टोकियो ऑलिम्पिकसाठी ती पूर्ण सज्ज झाली आहे.
राहीने आशियाई क्रीडा स्पर्धेतील 25 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीत दोन शूटऑफनंतर सुवर्णपदक मिळवले. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी ती भारताची पहिलीच नेमबाज ठरली. या आशियाई स्पर्धेतील नेमबाजीतील भारताचे हे दुसरे सुवर्णपदक ठरले. महिलांच्या 25 मीटर एअर पिस्तूलमध्ये राही व थायलंडची नफास्वान यांगपाईबून यांच्यात चांगलीच चुरस बघायला मिळाली. श्वास रोखून धरायला लावणारे दोन शूटऑफ हे या नेमबाजांची कसोटी पाहणारे ठरले. अखेर 27 वर्षीय राहीने स्पर्धा विक्रमासह सुवर्णपदक मिळवले. नफास्वानला रजतपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम फेरीत प्रत्येक नेमबाजाला दहा सीरिजना सामोरे जायचे होते. यात प्रत्येक सीरिजमध्ये नेमबाजाला पाच नेम साधायचे होते. या दहा सीरिजमध्ये राहीने 5, 5, 4, 2, 4, 5, 3, 2, 2, 2 अशा एकूण 34 गुणांचा वेध घेतला. नफास्वानचेही समान 34 गुण झाले. त्यामुळे शूटऑफचा निर्णय घेण्यात आला. यात दोघी नेमबाजांनी पाच पैकी चार वेळा लक्ष्य साधले. त्यामुळे पुन्हा बरोबरी झाल्याने दुसरा शूटऑफचा अवलंब करण्यात आला. यात राहीने तीन वेळा लक्ष्य साधले, तर नफास्वानला दोनच गुण मिळवता आले. दक्षिण कोरियाच्या किम मिनजुंगने ब्रॉंझपदक मिळवले.
महिलांच्या 25 मीटर पिस्तूलमध्ये राहीने सुवर्ण पटकावले. हे एशियाडमधील नेमबाजीत भारताचे नववे सुवर्ण ठरले. सौरभ चौधरीने सुवर्ण पटकावले होते. तत्पूर्वी, 1994 व 2006 सालच्या एशियाडमधील 25 मीटर सेंटर फायर पिस्तूलमध्ये जसपाल राणाने सुवर्ण मिळविले होते. तसेच, 2006 एशियाडमध्येच 25 मी. स्टॅंडर्ड पिस्तूल प्रकारात जसपालने सुवर्णवेध घेतला होता. 2014 एशियाडमधील 50 मी. पिस्तूलमध्ये जितू रायने, 1978 एशियाडमधील रणधिरसिंगने, 2010 एशियाडमधील ट्रॅपमध्ये रंजन सोधीने सुवर्णपदक पटकावले होते. तसेच, 2006 दोहा एशियाडमधील 25 मी. सेंटर फायर पिस्तूलमध्ये भारतीय संघाने सुवर्ण पटकावले होते. या सुवर्णविजेत्या संघात समशेर जंग, विजय कुमार, जयपाल यांचा समावेश होता.
राहीने 2013 मध्ये कोरीयात झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत 25 मी. पिस्तूलमध्ये सुवर्णपदक मिळवले होते. त्यानंतर राष्ट्रकुल स्पर्धेमध्येही 2010 आणि 2014 मध्ये सुवर्णपदकाची कमाई केली होती. 2010 च्या स्पर्धेत तिने दोन सुवर्णपदके मिळविली होती. एशियाडमधील तिच्या सुवर्ण कामगिरीवर आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. तो म्हणजे हे सुवर्णपदक तिने स्पर्धा विक्रमासह मिळवले आहे.
केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्या टीओपी (टार्गेट ऑलिम्पिक पोडीयम) योजनेत राहीचा समावेश आहेच. त्यामुळे तिला मानधनाव्यतिरिक्त अत्याधुनिक सोयीसुविधा देखील मिळत आहेत. त्यातच लक्ष्य या संस्थेकडून राहिला सातत्याने पाठिंबाही मिळत आहे. नेमबाजांसाठी ज्या बुलेट आवश्यक प्रमाणात उपलब्ध होणे गरजेचे आहे तितके मात्र होताना दिसत नाही, येत्या काळात यात सुधारणा झाली तर अनेक नेमबाजांना राहीसकट सर्वोत्तम सराव करता येईल. तिची आताची कामगिरी पाहता 2020 च्या टोकिओ ऑलिम्पिकमध्ये राही भारताला निश्चितच पदक मिळवून देईल असा विश्वास वाटतो.
– अमित डोंगरे