“हसत खेळत विज्ञान…’ या सदरात विज्ञानातील संकल्पना संवादाच्या माध्यमातून समजावून सांगणार आहेत. तेव्हा तयार व्हा मनोरंजनातून मूलभूत वैज्ञानिक संकल्पना समजून घ्यायला…
आची स्वयंपाकघरात कामाची लगबग चालली होती. तेवढ्यात प्रणव तणतणतच तिच्याकडे आला. आई, एकतर ही आभासी… ऑनलाइन शाळा. अन् त्यात तो विज्ञानाचा तास… काही म्हणजे काही कळत नाही. नुसती घोकंपट्टी करायची. आता नाही मला आवडत विज्ञान आणि गणित तरी मी का बर शिकायचे?
“अच्छा! असं आहे का?’ आईने प्रतिसाद दिला. “अगं बाकी विषय शिकताना, कसं डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. पण या दोन्ही विषयांमध्ये मात्र तसं काहीच घडत नाही. डोळ्यासमोर काही येतच नाही. मग काय अर्थ न समजता नुसते पाठ करावे लागते. आजच्या टेस्टमध्ये नाही आठवलं सगळं मला.’
“बरं. एखादे वेळेस टेस्ट नाही नीट देता येत. पण तुझ्या लक्षात आलं की विज्ञानासारखे विषय नुसत्या पाठांतराचे नाहीत. प्रयोगातून त्यातील संकल्पना नीट समजून येतात.’
“आई, तू मला प्रयोगातून विज्ञान समजावून सांगशील?’ प्रणवने विचारले.
“अरे, विज्ञान तर सगळीकडे असते. फक्त त्या नजरेने बघायची गरज आहे. पण आता आधी मी स्वयंपाक पूर्ण करते. तू काकडी, टोमॅटो चिरून घेतोस का?’ चिरून झालेल्या टोमॅटोची एक फोड तोंडात टाकत प्रणवने विचारले, “आई टोमॅटोसारखी कैरी आंबट असते. जरा जास्तच आंबट असते. लिंबू, संत्री, मोसंबी, चिंच, अननस, द्राक्ष… हे पण आंबट पदार्थ आहेत. असे अजून कोणते आंबट पदार्थ तू स्वयंपाक करताना वापरतेस?’
“अरे, व्हिनेगर, गाजर, चहा, ताक, दही हेसुद्धा चवीला आंबट आहेत. या सगळ्यात असणारे आम्लामुळे त्यांची चव आंबट येते. प्रत्येकात असणारे आम्ल हे वेगवेगळ्या स्वरूपाचे असते. जसे चिंच, अननस, द्राक्ष, गाजर यात असते टार्टारिक आम्ल. लिंबू, संत्री, मोसंबी या सारख्या फळात असते ते सायट्रिक आम्ल. दही ताकात असते ते लॅक्टिक आम्ल. चहात टॅनिक आणि व्हिनेगरमध्ये असते ते ऍसीटिक आम्ल आणि आम्लांमुळेच फळांची चव आंबट येते.’
आई अजून एक प्रश्न, “चव न घेता आंबट आहे की नाही किंवा त्यात आम्ल आहे की नाही कसे समजणार? म्हणजे शाळेत कोणत्या तरी एका कागदाचे नाव सांगितले होते. विसरलो आता,’ प्रणवने शंका विचारली.
“अरे, तो आहे लिटमस कागद. निळ्या रंगाचा लिटमस कागद आम्लात लाल होतो. तर लाल रंगाचा लिटमस कागद लालच राहतो. आपण असा प्रयोग घरातही करून बघू शकतो बरं का.’
“खरंच? सांग ना काय करू ते.’
“हे बघ त्यासाठी ताटलीत हळदीचे पाणी तयार कर. आता त्यात पांढऱ्या शुभ्र कागदाची लांब पट्टी टाक. छान पिवळा रंग आला ना त्याला. आपलं जेवण होईतो छान सुकायला ठेव.’
जेवण झाल्यावर भांडी धुवायला आईने साबणाचे पाणी तयार केले. प्रणवला त्यातील थोडे पाणी मगाशी केलेल्या पट्टीवर टाकायला सांगितले. नंतर त्या पट्टीवर लिंबू पिळायला सांगितले आणि काय काय केले याची कृती व निरीक्षण लिहून ठेव, असेही सांगितले.
बालमित्रांनो, तुम्हीसुद्धा प्रणवसारखा प्रयोग करून काय झालं व का झालं ते शोधणार ना?
पुढच्यावेळी चौकस प्रणव अजून काय शंका घेऊन येतो ते बघू.
– विशाखा गंधे