जीवन हे एक पुस्तक आहे. या पुस्तकातील प्रत्येक पान म्हणजे जणू एकेक वर्ष आहे. या वर्षातील एक एक अक्षर म्हणजे आपल्या आयुष्यात घडणारे प्रसंग. मग ते प्रसंग वैविध्यपूर्ण असतात. आनंद, दुःख, आव्हाने, समाधान, उत्साह, नैराश्य अशा एक ना अनेक भावनांनी हे प्रसंग भरलेले असतात.
आता या प्रसंगांशी आपण कशा पद्धतीने हाताळणी करतो त्यावर आयुष्याच्या अनेक व्याख्या ठरत असतात. व्यक्तीच्या आयुष्यातील तमोगुणांवर व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाला अर्थ प्राप्त होत असतो. आयुष्यातील प्रत्येक प्रसंग हा आपल्याला काही ना काही धडा देत असतो. त्यामुळे आनंदाचे प्रसंग आयुष्याच्या कुपीत जमा करून मनविरोधी प्रसंगांना अनुभवाचे साधन समजले पाहिजे.
अनेकदा आपल्या मनाप्रमाणे न झाल्याने आपण इतरांना दोषी ठरवतो. आपण स्वतःला आणि इतरांना माफ करू शकत नाही. कुठेतरी आपल्या गरिमेला ठेच लागल्याची वेदनादायी भावना मनात सतत सलत राहते. यामुळे आपण आपल्या आयुष्यात येणाऱ्या कित्येक आनंदाच्या आणि सुवर्णसंधींच्या क्षणांना मुकतो. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या मनाच्या गाभाऱ्यात ती वेदनादायी गोष्ट जतन करून ठेवलेली असते. जिची सल आपल्याला कायम टोचत असते. म्हणूनच आयुष्यात अनेक गोष्टींना योग्यवेळी सोडून द्यायला शिकले पाहिजे. सोडून दिल्यानेच आपण आयुष्याच्या पुढील आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सज्ज होत असतो.
रामराव आणि शामराव दोन्ही भावंडे गावाकडेच वाढलेली. वडिलांच्या निधनानंतर त्यांचा जमिनीवरून चुलत्यांशी वाद झाला. चुलते, चुलतभाऊ आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध संघर्ष उभा राहिला. रोज रोजच्या वादाने कडाक्याच्या भांडणाचे स्वरूप घेतले. एके दिवशी हा वाद वाढून भावनांचा बांध फुटला. दोन्ही घरात मोठा वाद झाला आणि या वादाचे पर्यवसन हाणामारीत झाले. या कडाक्याच्या भांडणात रामरावांच्या पायाला मोठी दुखापत झाली आणि त्यांना अंशतः अपंगत्व आले. त्यानंतर कायदेशीर लढाई सुरूच राहिली.
काही महिने सरले आणि रामराव शामरावला म्हणाले, या भांडणात अडकून काहीही निष्पन्न होणार नाही. त्यापेक्षा आपण शहरात जाऊन काहीतरी व्यापार सुरू करू. शामरावांनी मात्र यास नकार दिला. आपण लक्ष नाही दिले तर विरोधक काहीतरी नुकसान करतील अशी त्यांना भीती होती. वर्षामागून वर्षे सरली रामराव शहरात जाऊन व्यापार करून ऐषोआरामात जगू लागला. एकरभर जमिनीसाठी भांडणाऱ्या रामरावने यातून बाहेर पडून व्यापारातून स्वतःची पाच-पन्नास एकर शेती कमविली. तर शामराव मात्र अद्यापही जमिनीच्या खटल्यांमध्ये अडकून तेच वादविवादाचे जीवन जगत राहिला. आजही ही गोष्ट त्या खेड्यात चर्चेत असते.
एकाच घरातील दोन भाऊ. एक अजूनही हलाखीचेच जीवन जगतो. तर दुसरा मात्र श्रीमंतीचे आणि समाधानाचे जीवन जगतो. असे का बरं? तर एकाने धरून ठेवले तर दुसऱ्याने ते सोडून दिले. ज्याला आयुष्यभराचे अपंगत्व आले तो त्यातून बाहेर पडला आणि स्वतःचे वैभव उभे करू शकला. तर दुसरा दुसऱ्याच्या जखमांना रोज कुरवाळत ताणतणावात जगत राहिला. कारण एकाला सोडून द्यायचे कौशल्य अचूक जमले, तर दुसरा मात्र त्यात अपयशी ठरला.
आपल्याला सोडून देण्याची कला जमली पाहिजे. किंबहुना तो आपल्या दैनंदिन जगण्याचा एक भाग झाला पाहिजे. प्रत्येक वेळी प्रतिक्रिया द्यावीच असे नाही. कधीतरी काही गोष्टी सोडूनही देता आल्या पाहिजेत. अनेकदा आपल्याविषयी कुणीतरी काहीतरी बोलतं, आपल्या भावनांना ठेच लागेल असे वागतं. याच गोष्टीवर आपण जास्त विचार केल्याने आपल्या मनात गदारोळ माजतो. त्या विषयाभोवती चित्त केंद्रित झाल्याने आपले इतर कशातही लक्ष लागत नाही. इतरांना दोष देण्यात आणि पश्चाताप करण्यात दिवस जातात.
द्वेष, सूड, राग, अहंकार आणि नकारात्मक भावना आपले जिवलग मित्र बनतात. हे मित्र आपल्याला आनंद, समाधान, उत्साह आणि सकारात्मकता यांच्यापर्यंत पोहोचू देत नाही. अमुक केलं असतं तर बरं झालं असतं, मी विश्वासच ठेवायला नको होता, आता मी माफ करणार नाही, अशी वाक्ये आपल्याला निराशेच्या खाईत ढकलतात. आपण आपले अपेक्षित ध्येय आणि येणाऱ्या संधी कधीही प्राप्त करू शकत नाही.
म्हणूनच अशा गोष्टींवर आपली ऊर्जा वाया घालवू नका. या गोष्टींना सोडून द्यायला शिका. चूक कोणाची? का? कशी घडली? यापेक्षा अक्कलखात्यात जमा करून नवीन सुरुवात करा. जग खूप मोठं आहे आणि सुंदरही. त्यामुळे आनंद शोधायला शिका. प्रतिक्रिया देण्यापेक्षा सोडून द्यायला शिका.
सागर ननावरे