भावभावना याच्याशिवाय माणूस नाही किंबहुना हेच माणसाच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. कुणाची एखादी भावना तीव्र असते तर दुसरी सौम्य असते. पण रागाची, द्वेषाची भावना फार तीव्र झाली तर हातून दुष्कृत्य किंवा गुन्हा घडू शकतो.
अनपेक्षित घडलेली एखादी गोष्ट खूप आनंद देऊन जाते. पण हेच दुसऱ्याच्या बाबतीत चांगली गोष्ट घडल्यास तितकाच आनंद होतो का? इतरांचं चांगलं झालं की “मला का नाही?’ हे विचार बहुधा मनात येतात. काही जण म्हणतात, इतरांच चांगलं होवो, त्यापाठोपाठ आमचं होवो. या सदिच्छा छान असतात. हल्ली सदिच्छा दिल्या तरी आश्चर्य वाटतं. कारण चांगलं मन असणं दुर्मिळ झालंय. मनासारखे झाले नाही किंवा मनाविरुद्ध एखादी गोष्ट घडली की जीवाचा नुसता संताप होतो, नाही का!
माझ्या मनासारखे होत नाही म्हणजे काय? लहानपणी तर इतकी समज नसते. त्यामुळे जास्त चिडचिड होते. सगळं तोडून फोडून टाकावं असं वाटतं, हो ना. जरा समज आली की झालं गेलं विसरून जाऊन पुन्हा नव्याने सुरुवात करता येते.
प्रेमात पडलेल्या व्यक्तीच्या प्रेमात समोरची व्यक्ती प्रेम करेलच असं नाही. अशावेळी “मला नाही म्हणते’ किंवा “म्हणतो’ म्हणजे काय? त्याला/तिला मिळवून दाखवीन.’ अरे, ही काय वृत्ती? ते काय खेळणं आहे काय? हवं म्हणजे हवंच. कुणाला कोण आवडीवर आपलं वाटावं हे प्रत्येकावर अवलंबून आहे. पण असा विचार नाही केला तर फारच गडबड होते आणि काही वेळा भलतंच घडतं.
कोणत्याही वयात समजूतदारपणा हवा. भावनांवर नियंत्रण हवं. हल्ली या अति भावनांचा शरीरावर कसा विपरीत परिणाम होतो हे वरचेवर सांगितले जाते. परंतु माणसाला कोणत्याही वयात संयम, धीर, कमी झालाय असं वाटतं. म्हणून प्रत्येकाने “हेही दिवस जातील’ हे लक्षात घेऊन वागावं. कारण सतत सुख कुणाला मिळत नाही आणि सतत दु:ख, वाईट काळ कुणालाच नसतो. आवश्यक असतो तो संयम. सकारात्मक विचार, प्रयत्न करणे, निर्धार ठेवणे.
वाईट परिस्थितीत काही जण कमालीचे खचून जातात इतके की त्यांना वैद्यकीय उपचार घ्यावे लागतात. एवढी वेळ येते. हे होऊ द्यायचं की नाही हे आपल्या हातात आहे. कारण आपल्या क्षमता, तार्किक विचार करण्याची वृत्ती आपल्या हातात आहे.
डॉ. नीलम ताटके