विसाव्या शतकातला एक महान तत्त्ववेत्ता. तत्त्वज्ञानाच्या विविध शाखांमध्ये त्यांनी अत्यंत महत्त्वाचं योगदान दिलं. पण मानवी अस्तित्वापुढं उभ्या ठाकलेल्या अनेक समस्यांबाबत मांडलेल्या अभिनव विचारांमुळे ते सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय झाले.
बर्ट्रांड आर्थर विल्यम रसेल यांचा जन्म 18 मे 1872 रोजी इंग्लंडमध्ये गर्भश्रीमंत कुटुंबात झाला. त्यांचं घराणं सुधारणावादी विचारांचं होतं. जॉन स्टुअर्ट मिल यांच्या लेखन आणि विचारांचा रसेल यांच्या जीवनावर मोठा प्रभाव होता. रसेल यांच्या आई-वडिलांनी जगाचा निरोप घेतल्याने चार वर्षांच्या वयापासून त्यांचा सांभाळ त्यांच्या आजीने केला.
सुरुवातीला खासगी शिक्षकांकडून धडे गिरवल्यावर केंब्रिज विद्यापीठात त्यांचं शिक्षण झालं. गणिताची त्यांना लहानपणापासूनच प्रचंड आवड होती. गणित शिकण्याच्या अतीव इच्छेनं तरुण वयात मनात आलेले आत्महत्येचे विचार परतवून टाकले, असं रसेल यांनी म्हटलं आहे. केंब्रिजमध्ये त्यांनी गणित आणि तत्त्वज्ञानाचा अभ्यास केला. तर्कशास्त्रातल्या मूलभूत तत्त्वांवर गणिताची उभारणी करणारा “प्रिन्सिपिया मॅथेमॅटिका’ हा ग्रंथ त्यांनी त्यांचे गुरू अल्फ्रेड नॉर्थ व्हाइटहेड यांच्यासोबत मिळून साकारला. केंब्रिजमधले त्यांचे समकालीन जी. ई. मूर यांचाही रसेल यांच्यावर प्रभाव पडला.
रसेल केवळ गणित आणि तत्त्वज्ञानात रमत होते किंवा त्यांच्या उंची प्रासादांमध्ये राहून तत्त्वचिंतन करत होते असं नाही, तर त्यांच्यातला संवेदनशील माणूस त्यांच्या आसपासच्या, समाजातल्या सर्व घडामोडी टीपकागदासारखा टिपत होता. पहिल्या महायुद्धाला सुरुवात झाली तेव्हा रसेल यांना मोठा धक्का बसला. तो धक्का इतका जबरदस्त होता की त्याने त्यांना सार्वजनिक जीवनात यायला भाग पाडलं. त्यांनी या युद्धाला कठोर विरोध दर्शवला. परिणामी त्यांना ट्रिनिटी महाविद्यालयातून व्याख्याता पदावरून काढून टाकण्यात आलं; पण यामुळे ते तसूभरही डगमगले नाहीत.
“प्रिन्सिपल्स ऑफ रिकन्स्ट्रक्शन’ (1916) आणि “रोड्स टू फ्रीडम’ (1918) हे त्यांचे ग्रंथ म्हणजे सामाजिक संवेदनशीलता आणि मूलगामी चिंतनशीलता यांच्या अनोख्या मिश्रणाचा परिपाक. मानवी समाजाची, अस्तित्वाची, परस्परसंबंधांची निकोप रचना करण्यासाठी कोणत्या नीतीमूल्यांचा आणि तत्त्वांचा स्वीकार केला पाहिजे, याबाबत हे ग्रंथ तर्कनिष्ठ मांडणी करतात.
ब्रिटनचे मित्र राष्ट्र असलेल्या अमेरिकी सैन्याची निंदा केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. त्या आरोपाखाली त्यांना सहा महिने तुरुंगात जावं लागलं.
तिथं त्यांनी “इंट्रोडक्शन टू मॅथेमॅटिकल फिलॉसॉफी’ (1918) हा ग्रंथ लिहिला. समाजवादावर त्यांची श्रद्धा होती. त्याचा प्रसार करणाऱ्या “फेबिअन सोसायटी’सोबतही रसेल यांचे संबंध होते. स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळवून देण्यासाठीच्या, व्यक्तिस्वातंत्र्य, समता, शांतता यासाठीच्या अनेक चळवळींमध्येही त्यांनी जोमाने सहभाग घेतला.
दोन महायुद्धांच्या दरम्यान त्यांनी सामाजिक विषयांवर खूप लेखन केलं. त्यात “मॅरेज अँड मॉरल्स’ (1929) आणि “कॉंक्वेस्ट ऑफ हॅपीनेस’ (1930) अशा काही ग्रंथांचा समावेश आहे. “जर्मन सोशल डेमोक्रसी’, (1896), “फिलॉसॉफिकल एसेज’ (1910), “द प्रॉब्लेम्स ऑफ फिलॉसॉफी’ (1912), “द एबीसी ऑफ रिऍलिटी’ (1925), “द ऍनालिसिस ऑफ माईंड’ (1921), “द ऍनालिसिस ऑफ मॅटर’ (1927), “ऍन आउटलाइन ऑफ फिलॉसॉफी’ (1927), “हिस्ट्री ऑफ वेस्टर्न फिलॉसॉफी’ (1946), “ह्युमन नॉलेज, इट्स स्कोप अँड लिमिट्स’ (1948), “अनपॉप्युलर एसेज’ (1950) अशा विपुल आणि व्यापक ग्रंथसंपदेची रसेल यांच्या नावावर नोंद आहे. सोपी भाषा, उपरोधक शैली आणि प्रसंगोचित विनोदबुद्धीची चुणूक ही रसेल यांच्या लेखनाची वैशिष्ट्यं.
1938 मध्ये शिकागो विद्यापीठ आणि 1939 मध्ये न्यूयॉर्कमध्ये एका महाविद्यालयात रसेल यांची प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली; पण खासगी जीवनात ते अनैतिक आचरण करतात, असं कारण देऊन ती रद्दही करण्यात आली. 1940 मध्ये त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात त्यांनी दिलेल्या व्याख्यांनाचं संकलन “ऍन इन्क्वारी इन टू मीनिंग अँड ट्रूथ’ या नावाने प्रकाशित झालं.
दुसरे महायुद्ध सुरू झाले तेव्हा रसेल अमेरिकेत अडकले होते. तिथल्या तत्त्ववेत्त्यांनी रसेल यांना पाठिंबा देत त्यांच्या राहण्याची नि उदरनिर्वाहाचीही व्यवस्थाही करून दिली. याची एकप्रकारे परतफेड म्हणून रसेल यांनी “अ हिस्ट्री ऑफ वेस्टर्न फिलॉसॉफी’ (1940) हा लोकप्रिय ग्रंथ लिहिला.
तिथून 1944 मध्ये रसेल ट्रिनिटी महाविद्यालयाचे फेलो म्हणून लंडनला परत आले. 1949 मध्ये त्यांना “ऑर्डर ऑफ मेरिट’ या किताबानं गौरवण्यात आलं. अण्वस्त्रांवर बंदी घालण्यासाठी त्यांनी वयाच्या सत्तरीनंतरही अविरत प्रयत्न केले. त्यामुळे वयाच्या 89 व्या वर्षी त्यांना काही दिवस तुरुंगातही जावं लागलं.
रसेल यांचे अनेक विवाह आणि त्यांची प्रेमप्रकरणं हा नेहमीच उत्सुकतेचा विषय राहिला. त्यांनी त्यांच्या जीवनकाळात पाच लग्न केली. त्याखेरीज त्यांच्या जीवनात आलेल्या अन्य स्त्रियाही होत्या, असं त्यांचे जीवनकार्य अभ्यासणारांनी म्हटलं आहे.
तत्त्वज्ञानात कल्पनावादी किंवा सत्यात्मक आभासी भूमिकेला भरपूर वाव असतो. त्याच्या आधारे अनेक सिद्धांत मांडता येऊ शकतात आणि ते सिद्धही करता येऊ शकतात. परंतु त्यात विश्लेषणात्मक पद्धतीला तितकासा वाव नसतो, असं अनेक तत्त्वचिंतक सांगत. पण रसेल अखेरपर्यंत त्यांच्या वास्तववादी, अनेकतावादी भूमिकेवर ठाम राहिले. त्यांनी तत्त्वज्ञानासाठी विश्लेषणात्मक पद्धतीचा जाणीवपूर्वक अवलंब केला.
रसेल यांचा गणिताच्या बाजूने तत्त्वज्ञानाकडे जाण्याचा हा दृष्टीकोन विलक्षण आहे. तर्कशुद्ध पायावर गणिताची उभारणी करण्याचाही प्रयत्न रसेल यांनी केला. त्यामुळेच रसेल हे जी. ई. मूर यांच्यासोबत आधुनिक ब्रिटिश विश्लेषणात्मक तत्त्वज्ञानाचे उद्गाते मानले जातात.
रसेल यांना 1908 मध्ये रॉयल सोसायटीच्या सदस्यपदाचा मान मिळाला. तसंच रॉयल सोसायटीच्या सिल्व्हेस्टर मेडलनंही त्यांना गौरवण्यात आलं. त्यांच्या गणितविषयक कार्याच्या सन्मानार्थ लंडन मॅथेमॅटिकल सोसायटीनं त्यांना “द डी मॉर्गन मेडल’ प्रदान केलं. 1950 मध्ये त्यांना साहित्यासाठीच्या नोबेल पारितोषिकानं गौरवण्यात आलं. 2 फेब्रुवारी 1970 ला रसेल यांच्या तत्त्वचिंतनयात्रेनं कायमचा पूर्णविराम घेतला.
-डॉ. भालचंद्र सुपेकर