जुन्या हिंदी चित्रपटातील दृश्य आठवा. गुन्हेगार तुरुंगाच्या दरवाजातून बाहेर पडतो. तिथल्या रक्षकांना सलाम करतो. काही पावलं पुढे जातो तोच एका मोटारीतून गुंड बाहेर येतात आणि म्हणतात, “चलो. बॉसने बुलाया है. एक बडा प्लॅन है’. तुरुंगातून सुटलेला हिरो गाडीत बसतो आणि गाडी अड्ड्याच्या दिशेनं जाऊ लागते. कधी कधी हिरो तुरुंगातून बाहेर पडण्याआधी जेलर त्याला समजावून सांगतो, “देखो अब तुम रिहा हो जाओगे. अब पुराने धंदे छोड दो और एक नये अच्छी जिंदगीकी शुरुआत करो.’ अर्थात या उपदेशाचा काही परिणाम न होता हिरो पुन्हा गुन्हेगारीकडे वळतो. म्हणजेच जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही किंवा सुंभ जळला तरी पीळ जळत नाही!
चित्रपटातील दृश्य सोडून द्या, कारण पुढे काही कारणाने (बहुधा आई-बहिणींवर झालेल्या अत्याचारामुळे) हिरो बॉसची साथ-संगत सोडून चांगल्या मार्गाचा अवलंब करतो. पण प्रत्यक्षात काय घडतंय ते वृत्तपत्रावरून एक नजर फिरवली तरी ध्यानात येईल. जामिनावर किंवा पॅरोलवर सुटलेले कैदी पुन्हा गुन्हेगारीकडेच वळतात. म्हणजेच तुरुंगातील बंधयुक्त जीवनाचा त्यांच्यावर काहीच परिणाम होत नाही. त्यांच्या सुंभाचा पीळ इतका जबरदस्त असतो की तो जळतच नाही. काही गुन्हेगार तर इतके निर्ढावलेले असतात की त्यांच्यावर समुपदेशनाचा काहीही परिणाम होत नाही.
आपल्या रोजच्या जीवनातही सुंभ जळला तरी… ची कितीतरी उदाहरणं दिसून येतात. कर्जाऊ रक्कम घेतलेले (अगदी आपले जवळचे मित्रसुद्धा) अमुक एका दिवशी ती परत करण्याच्या आश्वासनाला न चुकता तिलांजली देतात. कधीही वेळ आणि वचन न पाळणारे तर पुनः पुन्हा हमी देतात आणि आपणही त्यांचा पीळ माहीत असून त्यांच्या अभिवचनाला बळी पडतो. नेत्यांचा तर सुंभ जळून त्याची राख झाली तरी पीळ जात नाही. प्रत्येक निवडणुकीला वचनं द्यायची, प्रतिज्ञा करायच्या आणि सवयीनुसार ती वचनं आणि त्या प्रतिज्ञा खिजगणतीतही नसल्याप्रमाणे वागायचं हा त्यांच्या सुंभाचा धर्मच आहे.
माणसाच्या कुसंस्कारांचं वळण-त्यांचा पीळ-इतका चिवट कसा असू शकतो याचं मला नवल वाटतं. विवाहित स्त्रीचा छळ करणारे, त्रास देणारे, वेगवेगळ्या मागण्या करणारे नवरा-सासू-सासरे-नणंद-दीर म्हणजे आपल्या समाजाला कलंक आहेत. अशा लोकांबद्दल तक्रारी आल्यावर पोलीस त्यांना समज देतात. वेळप्रसंगी त्यांच्याकडून चांगल्या वागणुकीचं हमीपत्र लिहूनही घेतात. पण तरीही घरी गेल्यावर त्यांचा ये रे माझ्या मागल्या हा प्रकार सुरू होतो. म्हणजेच त्यांचा पीळ सुटत नाही. मग पुन्हा तक्रार. या व्यूहात सापडलेली स्त्री बिचारी हत्या नाहीतर आत्महत्या या मार्गानं हे जग सोडून जाते.
मात्र सुंभ जळला… या वाक्प्रचाराला छेद देणारी काही उदाहरणं मला पाहायला मिळाली. मी काम करीत असलेल्या एका कंपनीतील एक फर्नेस ऑपरेटर अट्टल मद्यपी होता. कितीतरी वेळा सांगून सवरून त्याचं व्यसन काही सुटेना. नंतर एक चमत्कार घडला. कुण्या वडीलधाऱ्या माणसानं त्याला माळ घालून माळकरी बनवलं आणि खरोखरीच त्याचं व्यसन सुटलं. सुटीच्या दिवशी तो चक्क कीर्तनं करू लागला.
दुसऱ्या एका उदाहरणात एक कर्मचारी दांडीबहाद्दर होता. कामावर असताना तो खूप चांगलं काम करायचा. परंतु त्याच्या दांड्या मारण्याच्या सवयीला सगळे कंटाळले होते. वरिष्ठ व्यवस्थापकांनी एक युक्ती केली. अधिकाऱ्यांच्या मीटिंगमध्ये त्याला बोलावून घेतलं आणि त्याच्यावरील आरोपांचा पाढाच वाचला.
अभिरूप न्यायालयाप्रमाणे सर्व अधिकाऱ्यांना काय शिक्षा द्यायची ते विचारण्यात आलं. त्याला शेवटची संधी देण्यात यावी असं सर्वानुमते ठरलं. तथापि पुन्हा योग्य कारणाशिवाय आणि पूर्वपरवानगीशिवाय रजा घेणार नाही, असं त्याच्याकडून भर सभेत वदवून घेण्यात आलं. अहो आश्चर्यम्! त्यानंतर त्यानं वर्षभरात एकही सुटी न घेण्याचं रेकॉर्ड करून बक्षीस मिळवलं. कामाप्रती त्याची निष्ठा इतक्या थराला गेली की तो साप्ताहिक सुटीच्या दिवशीही कामावर येऊन अपुरं राहिलेलं काम करू लागला! पण असे अपवाद सोडता सुंभ जळला तरी पीळ जात नाही हेच खरं.
-श्रीनिवास शारंगपाणी