कधी कधी आपण आत्मविश्वास गमावून बसतो. कितीही अनुकूल संधी असली तरी आपल्याला त्या संधीचा फायदा उठवता येत नाही. अशा वेळी आत्मविश्वासाचा धागा कामी येतो…
फार पूर्वी एका तालमीत मल्लविद्या शिकण्याचे प्रशिक्षण दिले जात असे. त्या ठिकाणी अगदी दूरवरून मल्ल येत असत. त्या कुस्ती संकुलाचे वस्ताद हे प्रशिक्षणार्थी मल्लांना कुस्तीचे प्रशिक्षण देत असत. आज पुन्हा वस्ताद आपल्या मल्लांना कुस्तीचे धडे प्रात्यक्षिकासह देत होते. कुस्तीचे डावपेच शिकविताना ते दोन-दोन मल्लांत झुंजदेखील लावत होते. या मल्लांतील रणजीत नामक मल्ल मात्र कुस्तीपूर्वीच घाबरला होता. त्या सरावाच्या कुस्तीत तो वारंवार मागे सरत होता.
दोन पावले मागे घेत आक्रमणापासून संरक्षण करीत होता. त्याचे हे वागणे पाहून वस्तादांना मोठा प्रश्न पडला. व्यायामात अग्रेसर असणारा आणि सर्व डाव व्यवस्थित समजून घेणारा रणजीत प्रत्यक्ष मैदानात असे का वागतोय, हे त्यांना कळेना. सराव झाल्यानंतर वस्तादांनी रणजीतला त्यांच्या खोलीत बोलावले आणि त्याला विचारले, “कुस्ती विद्येत एवढा निपुण असणारा तू प्रत्यक्ष मैदानात का भयभीत होतोस?’
रणजीत सांगू लागतो, “वस्ताद माहीत नाही असं का होतंय? पण समोरचे माझ्यापेक्षा तगडे पहिलवान पाहिले की मला भीती वाटते. ते तर सहजच माझा चोळामोळा करतील या विचारानेच माझे अवसान गळून जाते.’
वस्तादांच्या लक्षात आले. वस्ताद रणजीतला घेऊन दुसऱ्या खोलीत गेले आणि त्यांच्या कपाटातून एक धागा काढून त्याच्या हातात बांधू लागले. बांधताना ते त्याला सांगू लागले, रणजीत हा धागा साधासुधा नाही तर जादुई धागा आहे. या धाग्याला बांधल्यामुळे तू कुस्तीत सहज बाजी मारू शकतोस. रणजीतला अतिशय आनंद झाला आणि तो त्याच्या खोलीत निघून गेला. परंतु या दोघांचे बोलणे तालमीतील काही मुलांनी ऐकले आणि तालमीत जादुई धाग्याची बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली.
दुसरा दिवस उजाडला. सर्व मल्ल सरावासाठी मैदानात आले. वस्तादांनी दोघा दोघांत कुस्ती लावून दिल्या. रणजीतची वेळ आली. आज रणजीत विरोधात तालमीतील सर्वांत तगडा आणि वजनदार मल्ल अजय होता. दोघांत कुस्तीला प्रारंभ झाला. आज रणजीत आपल्या डावपेचांनी अजयला सहज नमवित होता आणि अखेरीस रणजीतने बाजी मारलीच. वस्तादांनी रणजीतचे कौतुक केले आणि शाबासकी दिली. तेवढ्यात अजय आणि इतर पहिलवान वस्तादांना म्हणाले, “वस्ताद आम्हाला पण तो जादुई धागा द्या ना.’
वस्ताद हसले आणि म्हणाले, “माझ्या खोलीत जा आणि कपाटाच्या उजव्या बाजूला ठेवलेला धागा कापून आणा.’ सर्वजण धावत त्या खोलीत गेले आणि जाऊन हताश होत पुन्हा परतले. त्यातील एकजण बोलला, “काय वस्ताद तिथे कुठे आहे जादुई धागा? तिथे तर लंगोट वाळत घालण्यासाठी लांबलचक दोरा बांधलेला आहे.’
आता वस्ताद मोठमोठ्याने हसू लागले आणि हसतच त्यांना म्हणाले, “अरे तोच तर आहे जादुई धागा. मुळात तो जादुई वगैरे काही नाही तर एक साधा धागा आहे.’ आता रणजीतही अवाक होऊन ऐकू लागला. वस्ताद पुढे बोलू लागले, “आपल्यातील मनोबल खचलेल्या पहिलवानाला जागेवर आणण्यासाठी मला त्याला जादुई नाव द्यावे लागले आणि माझ्या त्या शब्दाने त्या पहिलवानाचा आत्मविश्वास जागा झाला.’आता मात्र सर्वत्र निःशब्द शांतता पसरली. रणजीतला तर या प्रसंगातून आत्मविश्वासाचा एक धागा मिळाला होता.
आयुष्यात अनेकदा असे काही प्रसंग आपल्या वाट्याला येतात. ज्यावेळी आपण आपले मनोबल गमावून बसतो. मनात भीतीची, न्यूनगंडाची भावना निर्माण होते आणि मग आपण हताश होऊन प्रयत्न करणे सोडून देतो. अनेकदा पर्याय शोधत बसतो. अशावेळी आपल्याला गरज असते ती अशाच एका आत्मविश्वासाच्या धाग्याची. जो धागा आपल्याला आत्मविश्वास तर देतोच शिवाय आपल्यातील प्रबळ इच्छाशक्तीला जागृत करतो. आपल्याला प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्याचे बळ देतो.
परंतु हा धागा आता मिळणार कुठे? तर हा धागा म्हणजेच आत्मविश्वास वाढविणाऱ्या कृती, प्रसंग, शब्द, सल्ले आणि मार्गदर्शन होय. यासाठी आपण नेहमीच योग्य व्यक्ती व वातावरणाची निवड करायला हवी.
स्वतःला ओळखायला हवे, स्वतःच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवायला हवा. आत्मविश्वास आणि सकारात्मकता वाढविणाऱ्या गोष्टींना प्राधान्य द्यायला हवे. आपणच आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणारा धागा शोधला पाहिजे.
आयुष्यात कठीण प्रसंगांना सामोरे जाणाऱ्या स्वकियांसाठी आपणही कधीतरी आत्मविश्वासाचा धागा बनले पाहिजे. कदाचित हाच धागा आपल्याही आत्मविश्वासाला बळ देऊ शकतो.
सागर ननावरे