जगाची वाटचाल गरजेच्या नियमांवरून चालली आहे. ज्या सूर्याच्या किरणांची हिवाळ्यात वाट पाहिली जाते, त्याच सूर्याचा उन्हाळ्यात तिरस्कार केला जातो. पूर्वग्रहांच्या रुळावरून चाललेल्या जीवनातून स्वीकार गायब आहे. एखाद्या वेळी स्वीकार दिसलाच तरी तो क्षणिक आणि गरजेपोटी दिसतो. घराची भिंत एकदा क्षीण झाली तर नात्यांचे छप्परही कोसळून पडते, हे आपण विसरून गेलो आहोत. आभासी दुनियेत छंदही अशा ठिकाणी पोहोचले आहेत, जिथे केवळ खुशामत केली जाते. जे तुम्ही केले आहे, त्याचे फक्त समर्थनच व्हायला हवे. विरोध केला तर तो तुमचा शत्रू! हे शत्रू तुम्हाला उपेक्षेच्या चक्कीत भरडून काढतात.
आपण ज्या प्रकारचे जीवन जगत आहोत, ते पाहता दीर्घायुष्याचा आशीर्वाद देण्यात खरोखर काही अर्थ उरला आहे का? जीवनाच्या नावाखाली आपण जे जगतो आहोत, त्याविषयीचा हा महत्त्वपूर्ण सवाल आहे. जीवन आणि अस्तित्वाच्या भौतिक स्थितीविषयी स्वामी विवेकानंदांनी म्हटले होते की, शरीर जितके सक्रिय राहते तितके ते निरोगी राहते. मन जितके स्थिर राहील तितके ते निरोगी राहते. विज्ञानाच्या क्षेत्रात रैखिक (लीनिअर) विकासाची एक कल्पना केली जाते. परंतु क्रमिक विकासाचा मुद्दा त्यासाठी फारसा लागू होत नाही. तिथेही एका प्रारूपाच्या परिघात वैज्ञानिक विचारांचा विकास होतो.
आधुनिक होत असलेल्या समाजात होत असलेले सामाजिक परिवर्तन नात्यांचे व्याकरण पूर्णपणे बिघडवून टाकत आहे. मनुष्याच्या आतमध्ये आदिम काळातील हिंसक पशुजीवनाच्या स्वच्छंदतेचे अवशेष पुनर्जीवित होत आहेत. नव्या काळात हळूहळू धर्म, ईश्वर, पाप, पुण्य, शील आणि आचार यांसारखे शब्द इतिहासजमा झाल्याचे जणू निश्चित करण्यात आले आहे. त्याजागी स्वायत्त होत असलेला माणूस निरंकुश, बिनधास्त आणि दिशाहीन होत चालला आहे. प्रदर्शनाची हौस हे मानवाचे वैशिष्ट्य बनत चालले आहे. मानवी विचारशक्तीवर पूर्वग्रह आणि दुराग्रह यांचा प्रभाव वाढत आहे.
अर्थव्यवस्थेने माणसाला नफा-तोट्याच्या दुष्टचक्रात अडकवून केवळ ग्राहक बनवून ठेवले आहे. जीवनासाठी धावाधाव करणे हा जणू वाक्प्रचार बनला आहे. शक्तीचा शोध आणि प्राप्ती या गोष्टी आपल्याला वैयक्तिकरीत्या भित्रे बनवत आहेत. लोक अधिकाधिक बुद्धिमान होण्याऐवजी अधिकाधिक चलाख होत चालले आहेत. मनुष्य आणि वाळवी यांच्यात काहीच फरक उरलेला नाही. दोघांनाही वर-वर चढायचे आहे आणि दोघेही मातीत मिसळून जाणार आहेत.
बंद दरवाजाच्या आत दुनिया खरोखरच बंदिस्त झालेली आहे. घरातील किंकाळ्या आणि आकांत कधीकाळी शेजारीपाजारी ऐकत होते. आज शेजारच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्याला ते ऐकू येत नाहीत. आदिवासीसुद्धा भविष्य आणि भूतकाळाच्या भीतीमुळे मुक्त वर्तमानात राहणे पसंत करीत आहेत. परंतु शहरी लोक तसे नाहीत. आपला आनंद साजरा करण्याची जागा अंगण ही होती. मुले अंगणात खेळत बागडत असत. आजी मुलांना याच अंगणातून चांदोमामा दाखवत असे. या गोष्टी आपल्या आयुष्यातून निघून गेल्या आहेत. तारुण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असणाऱ्या मुलांना आपल्या आईवडिलांचा सहवास लाभत नसल्यामुळे गंभीर संकेत मिळत आहेत. आपल्या आशा आकांक्षा, मर्यादा आणि अडचणींवर केली जात असलेली टिप्पणी त्यांना उत्तेजित करण्याबरोबरच विस्मयचकित करत आहे.
टी. एस. इलियट यांनी कवितेची व्याख्या देण्याऐवजी एवढेच सांगितले की, पोएट्री इज वर्डस, वर्डस अँड वर्डस… अर्थात कविता म्हणजे केवळ शब्द, शब्द आणि शब्द असतात. सोनार ज्याप्रमाणे दागिने घडवतो तसे कवी शब्द घडवतो. वॉटर पेंटर यांनी म्हटले आहे की, एकच गोष्ट सांगण्याचे अनेक मार्ग असतात. शब्दच ती गोष्ट सांगू शकतात. निवडक, कोरीव आणि हृदयापासून निघालेले शब्द एकमेकांना जोडले तर सोन्याहून पिवळे असे काम करून दाखवतात. हे प्रयत्न आता बंद झाले आहेत.
आता शब्दांऐवजी भाव प्रकट करण्याचा काळ सुरू आहे. जेव्हा नैतिक आत्मचेतना विकसित होते तेव्हा मनुष्य स्वतःच आपल्या व्यवहाराला शिक्षा देतो वा पुरस्कृत करतो, असे म्हटले जाते. परंतु नैतिक चेतनेचा लोप झाल्याने केवळ आपल्या व्यवहाराला पुरस्कृत करण्याचीच चाल सध्या आहे. जे काही घडत आहे, जो कोणी करत आहे, समाजात किंवा कुटुंबात… ते त्याला करू द्यावे. त्याला अडवू नका. कारण बातचीत करताना एकमेकांचा तर्क ऐकण्याचे धैर्य समाजातून संपुष्टात येत आहे. शस्त्रे केवळ शरीराला जखमी करतात; परंतु यांचे भाव आत्म्यालासुद्धा जखमी करतात. ज्यांनी आत्म्याला जखमी करण्याचा विडाच उचलला आहे, त्यांना समाजाची लाज आणि शिक्षेचे भय या दोन्ही गोष्टी वाटेनाशा झाल्या आहेत. अशा व्यक्तींच्या जवळपासही फिरकता कामा नये; कारण अशा लोकांची मैत्री आपल्याला वाईट कृत्य करण्याइतपत कोडगे बनवू शकते. अशा व्यक्तींची एखादी गोष्ट वाईट असल्याचे वाटल्यास व्यक्ती महत्त्वाची असल्यास गोष्ट विसरून जा आणि व्यक्ती महत्त्वाची नसेल तर व्यक्ती विसरून जा.
जीवनात ज्या चुकांबद्दल क्षमा मागण्याची वेळ निघून गेलेली असते अशा चुका आपल्याला खूप त्रास देतात. आपल्या चुकांचा वेळेवर स्वीकार करणे आणि चुकांबद्दल वेळीच माफी मागून जीवन सामान्य राखणे हीच गोष्ट चांगली. परंतु असे करतो कोण? त्यामुळेच आनंदी असताना वचन देऊ नका, रागात असताना उत्तर देऊ नका, दुःखी असताना निर्णय देऊ नका. दररोज सकाळी उठल्यावर परमात्मा आपल्याला दोन मार्ग देतो- उठून आपले स्वप्न साकार करणे किंवा झोपून राहून आपले स्वप्न साकार करणे.
आजकाल झोपून राहून आपले स्वप्न साकार करण्याचा काळ आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करणे वगैरे निव्वळ बाता वाटू लागल्या आहेत. तसे पाहायला गेल्यास प्रयत्न केल्यावर यश किंवा अनुभव, काही ना काही मिळतेच! नाती बनवणे तर मातीवर मातीने माती असा शब्द लिहिण्याइतके सोपे आहे. नाती जोपासणे आणि निभावणे मात्र पाण्यावर पाण्याने लिहिण्याइतके अवघड आहे. परंतु आपण ना मातीवर मातीने लिहितो, ना पाण्याने पाण्यावर लिहितो. जगाची वाटचाल गरजेच्या नियमांवरून चालली आहे. ज्या सूर्याच्या किरणांची हिवाळ्यात वाट पाहिली जाते, त्याच सूर्याचा उन्हाळ्यात तिरस्कार केला जातो. पूर्वग्रहांच्या रुळावरून चाललेल्या जीवनातून स्वीकार गायब आहे.
ज्याचे पोट भरलेले असते तो चिंतन करतो. ज्याचे पोट रिकामे असते तो चिंता करतो. चिंताच माणसाला तीळ-तीळ संपवत जातात. मनाला एखाद्या छंदाच्या दिशेने वळविणे हा चिंतेवरील उपाय आहे. आपण आपल्याच दुनियेत मश्गुल आहोत. आभासी दुनिया चित्रविचित्र आहे. इतरांप्रमाणे आपल्याला बनावे लागते. तसे बनता आले नाही तर आपल्या आनंदासाठी पराभव स्वीकारा. हेच योग्य ठरेल. कारण त्यांना त्यांच्या प्रतिष्ठेची अजिबात फिकीर नसते. दरवेळी लक्ष्मणरेषा ओलांडणे हेच त्यांच्या जगाचे वैशिष्ट्य असते. प्रतिष्ठेचे वय त्यांच्या वयापेक्षा अधिक असते, हे त्यांना माहीत नसते. जीवन लहान अजिबात नसते; फक्त आपण जगायला उशिरा सुरुवात करतो.
योगेश मिश्र