पर्यावरण विभागाचे दुर्लक्ष : नागरिकांनाही होतोय त्रास
सांगवी – पिंपळे गुरव परिसरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांमुळे निर्माण झालेला राडारोड्याची विल्हेवाट लावण्याचे नियोजन केले नसल्याने जागा दिसेल तिथे राडारोडा टाकला जात आहे. तर, परिसरातून वाहणाऱ्या पवना नदीच्या काठावर सर्रास राडारोडा टाकून त्यावर व्यवसाय थाटले जात आहे. यावर पर्यावरण विभाग व प्रदूषण नियत्रंण विभागाचे कुठलेही नियंत्रण नसल्याने हा सर्व प्रकार पवनेच्या मुळावर आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
रस्त्याच्या दुतर्फाही राडा-रोडा टाकल्याने नागरिकांनाही त्रास होऊ लागला आहे. गेल्या अनेक महिन्यापासून पिंपळे गुरव परिसरात स्मार्ट सिटी अंतर्गत रस्त्याची कामे सुरू आहेत. यामुळे परिसरातील रस्ते प्रशस्त होत आहेत. मात्र, दुसऱ्या बाजूला राडारोड्याच्या नियोजना अभावी पर्यावरण बिघडत चालले आहे. नवीन रस्ते बनविताना जुन्या रस्त्यांचा डांबरासहित राडारोडा मोठ्या प्रमाणात निघाला आहे.
मात्र, हा राडारोडा कुठे टाकायचा याचे नियोजन करण्यात आलेले नसल्याने जिथे जागा मिळेल तिथे राडारोडा टाकला जात आहे. याचा मोठा फटका पवना नदीपात्राला बसत असून नदीपात्राच्या दोन्ही बाजूला टाकून नदीपात्र अरुंद केला जात आहे. तर, या राड्यारोड्याला काहीजन पसरवून त्यावर व्यवसाय थाटले जात आहे. पिंपळे गुरवमधील सृष्टी चौकाकडून कासारवाडीकडे जाताना पवना नदीपात्रालगत राडारोडा मोठ्या प्रमाणात टाकण्यात आला आहे. या राडारोड्यामुळे सृष्टी चौकाकडून कासारवाडीकडे जाणारा रस्ताच अरुंद होत चालला आहे.
रस्त्याच्या दुतर्फा राडारोड्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे व पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली आहे. कारवाईचा केवळ दिखावा होतो कारवाई होत नसल्याचे चित्र आहे.