टाकळी हाजी(प्रतिनिधी) – शाळा बंद असल्यामुळे ऊसतोड करणाऱ्या मजुरांची मुले आई वडिलांना ऊसाच्या फडात मदत करत फिरत होती. त्यावेळी दत्तात्रय जगताप हे शिक्षक असल्याचे त्यांना समजले. त्यावेळी या चिमुकल्यांनी गुरुजी आमालाबी शिकवा ना अशी साद घातली. त्यावेळी 16 मुलांना गुरुजींनी पाटी, पुस्तक अन् वहया, देत शिक्षणाचा श्रीगणेशा केला. यामुळे ही मुले अक्षरे गिरवू लागली. हे पाहून त्यांचे पालकही भारावून गेले.
आमदाबाद (ता. शिरूर) येथे शिक्षक दत्तात्रय जगताप यांच्या शेतात ऊस तोडणी सुरू आहे. सध्या शाळा बंद आहेत. त्यामुळे ऊसतोड मजुरांसोबत मुले उसाच्या फडात येतात. त्या मुलांना हे शेत गुरुजीचे आहे, अशी कुणकुण लागली. गुरुजी शेतात जाताच मुलांनी गुरुजींना गाठले आणि तुम्ही गुरुजी आहात ना आमालाबी शिकवाल का? असा सवाल केला. याप्रसंगी गुरुजींचेही डोळे पाणवले आणि त्यांच्या मधील शिक्षक जागा झाला.
अनेक कविता संग्रह लिहणारे जगताप गुरुजींनी तत्काळ या मुलांसाठी वह्या, पुस्तक, पाटी, पेन्सिल, मास्क घेऊन आले. शेतातील आंब्याच्या झाडाखाली बसून मुले धडे गिरवू लागली. या उपक्रमामुळे सर्व स्तरांतून दत्तात्रय जगताप गुरुजी यांचे कौतुक होत आहे.
जगताप गुरुजी हे लाखेवाडी (ता. शिरूर) येथे मुख्याध्यापक आहेत. त्यांनी शाळेत अनेक उपक्रम राबविले आहेत. उपक्रमशील शिक्षक म्हणून ते काम करीत आहेत. यावेळी शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते उपस्थित होते. जगताप गुरुजींच्या उपक्रमांचे माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परीषद सदस्या सुनिता गावडे, गटविकास अधिकारी विजयसिंह नलावडे, गट शिक्षण अधिकारी राजेसाहेब लोंढे, विस्तार अधिकारी महादेव बाजारे यांनी अभिनंदन केले.