वाघोली -परिसरातील मार्च महिन्यापासून केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमध्ये डबघाईला आलेल्या उद्योगांना आत्ता उभारी मिळू लागली आहे.
अनेक सुरक्षिततेच्या उपाययोजनाच्या अंमलबजावणीतून करोना प्रादुर्भाव कमी होण्यास मदत झाली आहे. सध्या राज्य सरकारने अनेक अटी व नियम घालून करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी छोट्या मोठ्या उद्योजकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. करोनाचा परिणाम अनेक व्यवसाय व उद्योगधंद्यावर झाला आहे. आर्थिक मंदी सदृष्य परिस्थितीमधून अनेक व्यवसाय पुन्हा एकदा उभे राहताना दिसत आहेत.
नागरिकांनी सुरक्षिततेच्या उपायांची कडक अंमलबजावणी केली तर उत्तम आरोग्या बरोबर उत्तम व्यवसाय सुरू ठेवण्यास देखील मदत होऊ शकेल, असा हा प्रयत्न सध्या उद्योजकांमधून सुरू असल्याचे दिसून येत आहे.
बांधकाम व शेती व्यवसायाशी निगडीत व्यवसायांना सुरुवात झाली आहे. जेसीबी, ट्रॅक्टर, इतर यंत्रसामुग्रीला काम मिळण्यास सुरुवात झाली आहे. या व्यवसायाशी निगडित असणारे वाहनचालक व मालकांना पुन्हा एकदा व्यवसायभिमुख वातावरण निर्माण झाले आहे.
– प्रमोद भाडळे, संचालक, प्रमोद एंटरप्राइजेस वाघोली.
केंद्र व राज्य सरकारने राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर अत्यावश्यक सेवेतील प्रवासाकरिता आरोग्यदायक अटी व शर्ती घालून काही प्रमाणात सवलती दिल्या आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रवास काही देशांमध्ये सुरू झाला आहे. त्यामुळे त्या देशांमध्ये पर्यटनास पुन्हा एकदा चालना मिळाली आहे. वाढत्या करोनाचा आकडा पाहता नागरिकांनी आरोग्यदायक सवयी लावून पर्यटनाचा आनंद घ्यावा.
– साबीर शेख, व्यवस्थापकीय संचालक, रुबी टूर्स अँड ट्रॅव्हल्स प्रा. लि. पुणे.
सध्या जुन्या आणि नव्या चारचाकी वाहनांच्या खरेदी-विक्रीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये मध्यमवर्गीय नागरिकांकडून वाहन खरेदीचा कल वाढला आहे. नागरिकांनी अटी व नियमांचे पालन करून वाहन खरेदी करण्यासाठी पुढाकार घ्यावा.
– शाईद मेमन, व्यवस्थापकीय संचालक टॉप कार्स पुणे.