दम्बुला – हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाला यजमान श्रीलंकेचा पराभव करत तीन टी-20 सामन्यांच्या या मालिकेत 3-0 अशी निर्विवाद वर्चस्वाची संधी आहे. आज (सोमवार) या दोन संघात हा सामना होत असून पहिले दोन्ही सामने जिंकत भारताने 2-0 अशा विजयी आघाडीसह मालिका यापूर्वीच जिंकली आहे. आता हा तिसरा सामना जिंकत श्रीलंकेला व्हाइटवॉश देण्याची संधी भारतीय संघाला लाभली आहे.
वरिष्ठ खेळाडू व माजी कर्णधार मिताली राजच्या निवृत्तीनंतर हरमनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्वकरंडक स्पर्धेनंतर पहिलीच आंतरराष्ट्रीय मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिली लढत भारतीय संघाने 34 धावांनी जिंकली होती. तर दुसरा सामना 5 गडी राखून जिंकत मालिकेत विजयी आघाडी घेतली होती. या टी-20 सामन्यांच्या मालिकेनंतर पालेकेल्ले येथे या दोन संघात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. त्यामुळे टी-20 मालिकेत निर्विवाद वर्चस्व राखत एकदिवसीय मालिकेतही आपलीच मक्तेदारी कायम राखण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. मात्र, त्यासाठी भारतीय संघातील गोलंदाजांना सरस कामगिरी करावी लागणार आहे.
सामन्यादरम्यान चाहत्यांनी निदर्शने
श्रीलंकेत सध्या आर्थिक आणीबाणी असल्याने या सामन्याला चाहत्यांची उपस्थिती अत्यंत कमी आहे. मात्र, जे चाहते मैदानात उपस्थित होते त्यांपैकी काहींनी श्रीलंका सरकार तसेच श्रीलंका क्रिकेट मंडळाविरुद्ध निदर्शने केली. देशात अराजक परिस्थिती असतानाही क्रिकेटचे सामने भरवण्याचे कारण काय, अशी विचारणा करणारे फलकही मैदानात झळकावले गेले.
दुसऱ्या टी-20 लढतीत भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने फलंदाजी व गोलंदाजीत चमक दाखवली व संघाच्या विजयात मोलाचा वाटा घेतला. मात्र, स्टार खेळाडू स्मृती मानधनासह सर्व प्रमुख फलंदाजांना जास्त जबाबदारीने खेळ करावा लागणार आहे. तसेच श्रीलंकेच्या विश्मी गुणरत्ने, चामरी अटापट्टूसह पहिल्या पाच प्रमुख फलंदाजांना लवकर बाद करण्यासाठी भारतीय गोलंदाजांना शिकस्त करावी लागणार आहे.