भोर(प्रतिनिधी) – भोर शहराला गेल्या दोन-तीन दिवसांपासून गाळमिश्रीत गढूळ पाण्याचा पाणीपुरवठा सुरू असून पाणी पुरवठ्याची स्थिती अशीच राहिल्यास साथीचे आजार बळावण्याची भीती असल्याने शहरातील नागरिक नगरपालिका प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त करीत आहेत.
भोर शहरात नवीन पाइपलाइन टाकण्याचे आणि नवीन 3.5 एमएलडीच्या जलशुध्दीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. सुमारे 20 लाख लिटर पाण्याच्या टाकीसाठी 73 लाख रुपये निधी मंजूर असून हे कामही सुरू आहे. मात्र, तरीही भोर शहरातील नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा होत नाही. गेल्या दोन-तीन दिवसापांसून शहरात गाळमिश्रीत आणि दूषित पाणीपुरवठा होत आहे. सध्या पावसाळा सुरू असून असाच पाणीपुरवठा सुरू राहिल्यास साथीचे आजार बळावण्यची भीती व्यक्त होत आहे.
“भोर शहराला भाटघर धरण जलाशयातून जलशुध्दीकरण केंद्रावर पाणी शुध्द करून ते शहराला पुरवले जाते. सध्या संततधार पावसामुळे थोड्याफार प्रमाणात गढूळ पाणीपुरवठा होत आहे. पुढील तीनचार दिवसात शुध्द पाणीपुरवठा सुरू होईल, तोपर्यंत नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावे.
– निर्मला आवारे (नगराध्यक्ष) आणि अमित सागळे (उपनगराध्यक्ष)
भोर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पूर्वी 90 एचपी व 50 एचपीचे दोन विद्यीत पंप, तसेच एक डीआय पाइपलाइन, एक सिमेंट पाइपलाइन होती. सिमेंट पाइपलाइन खराब झाल्यामुळे सारखी फुटत असल्याने शहरातील रोज नियमित पाणी मिळत नव्हते, त्यामुळे आमदार संग्राम थोपटे यांनी महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत नगरपालिकेला सुमारे 13.50 कोटी रुपयांची नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर केली. मात्र या योजनेचे काम संथ गतीने सुरू होते, त्यामुळे काम होण्यास उशिरा झाला आहे.