मुंबई – दिवाळीमध्ये मुंबईत होणा-या ध्वनी प्रदूषणामध्ये काही वर्षांपासून घट होत असल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात आवाज फाऊंडेशनकडून यंदाचा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. यात वांद्रे, माहिम, वरळी, शिवाजी पार्क, बाबुलनाथ आणि मरीन ड्राईव्ह परिसरात ध्वनी प्रदूषणात किंचीत घट झाल्याचे दिसून येत आहे.
यावर्षी मोठ्या प्रमाणात प्रदूषणाविरोधात मोहिम राबवण्यात आल्याने आणि नागरिकांमध्ये हरित फटाक्यांसंदर्भात जनजागृती केल्याने ध्वनीप्रदूषणात घट झाल्याचे पाहावयास मिळत आहे. शिवाजी पार्क परिसरात सर्वाधिक डेसिबलची नोंद झाली ज्यात फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे 100.4 डेसिबलची नोंद करण्यात आल्याचे अहवालात म्हंटले आहे.
दरम्यान, असं असलं तरी रात्री 10नंतर देखील फटाक्यांची आतिषबाजी या परिसरात चालूच असल्याची देखील नोंद करण्यात आली आहे. या परिसरात पोलिसांची उपस्थिती तर नव्हतीच सोबतच पोलिसांकडून पेट्रोलिंग देखील करण्यात आली नसल्याचे अहवाल सांगतो.
दुसरीकडे मरीन ड्राईव्ह परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त असल्याने ध्वनी प्रदूषण कमी झाल्याचे दिसून आले. 2019 सालाआधीपर्यंत मरीन ड्राईव्ह परिसर हा फटाक्यांच्याआतिषबाजीसाठी केंद्रबिंदू असायचा. मात्र यावर्षी मरीन ड्राईव्ह परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त असल्याने शुकशुकाट बघायला मिळाला. 2019 साली मरीन ड्राईव्ह परिसरात 112.3 डेसिबलची नोंद झाली होती तर 2020 साली देखील 105.3 डेसिबलची नोंद करण्यात आली होती.
शहरातील इतर ठिकाणी जेथे आवाज मोजला गेला तेथे तुरळक फटाक्यांचा वापर होता जो रात्रीपर्यंत चालूच होता, असे आवाज फाऊंडेशनच्या अहवालात नमूद करण्यात आले. बहुतेक ठिकाणी हरित फटाके वापरले गेल्याने तुलनेने आवाजाची पातळी पारंपरिक फटाक्यांपेक्षाकमी होती. यात प्रामुख्याने अनार, सुरसुरी, चक्री, रॉकेट आणि काही हवेत जाणाऱ्या फटाक्यांच्या समावेश होता.