ताई आज अगदी निवांत बसल्या होत्या. अर्थात त्या तशा नेहमीच निवांत असत. त्यांना घाई गडबड कशाचीच नव्हती. वयाची नव्वदी पार पडली होती. ईश्वरकृपेने तब्येत अगदी ठणठणीत होती. चांगली प्रकृती ही त्यांच्या घराण्याची परंपराच होती. त्यांची आई गंगूबाई चांगली 96 वर्षांची होऊन गेली. शेवटपर्यंत चांगली हिंडती फिरती होती. आणि चालता बोलता गेली. नेहमीप्रमाणे सकाळी मंदिरात जाऊन आली. येऊन पाणी प्याली. सुनेला चहा ठेव म्हणाली कपभर. चहा होईपर्यंत पाच मिनिटे आडवी होते, म्हणाली, पाच नव्हे, दहा मिनिटे झाली तरी पण ती काही चहा प्यायला उठली नाही. तिला काळझोपच लागली होती. झोपेतच तिच्यासाठी स्वर्गाची दारे उघडली होती.
आईची आई, म्हणजे ताईंची आजीही अशीच दीर्घायुषी-वयाचे शतक पूर्ण केलेली. त्याच माळेतल्या ताई. अगदी वयाची नव्वदी झाली तरी डोळे, कान चांगले. नाही म्हणायला “दंताजींचे ठाणे उठले’ होते, पण पूर्णपणे नाही. त्यातीलही काही जण अजून टिकाव धरून होते. त्या हसल्या की ते दोनचार दात लुकलुकत. काहीसे केविलवाणेपणाने. मात्र त्यांच्या डोळ्यात अजूनही चमक होती.
फॅमिली पेन्शनवर त्यांचे अगदी ठीकठाक चालले होते. मुळात त्यांचे सारे काही अगदी व्यवस्थित-टापटीप असल्याने चार पैसे राखून होत्या. तीन मुले-तीन मुली होत्या, पण कोणावरी त्यांचा भार नव्हता. अजूनही त्या स्वतंत्र राहत. मुले, नातू, पणतू अधूनमधून भेट देऊन जात. लहर लागली की त्या कोणत्याही मुलाकडे वा मुलीकडे चार दिवस मजेत जाऊन राहत. म्हणूनच म्हटले, की त्या अगदी निवांत होत्या.
त्यांचा वडिलोपार्जित वाडा आहे. फार जुना-तो पेशव्यांच्या काळापासूनचा आहे असे सांगत-असेलही. पण तो वाडा पाडून तेथे संकुल बांधण्याची योजना होती, आणि त्यासाठी ताईंची सही आवश्यक होती. त्या पिढीतील ताई सर्वात मोठ्या. नवीन कायद्यानुसार इस्टेटीवर बहिणींचाही समान हक्क असल्याने वाडा पाडून संकुल उभारण्यासाठी ताईंची सही अनिवार्य होते.
तसे पाहिले तर ताईंना कशाचाच मोह नव्हता. मात्र माहेरच्या वाड्याबद्दल त्यांना अतिशय जिव्हाळा होता. आणि अभिमानही होता. आपले आणि आपल्या सहा मुलांचे बालपण त्या वाड्याने पाहिल्याचा त्यांना सार्थ अभिमान होता. वाडा विकण्याचा विषय निघताच त्यांचा मूड बिघडला. त्यांच्या डोळ्यासमोरून त्यांचे त्या वाड्यात गेलेले बालपण उभे राहिले. तेथे वावरलेले आईवडील, आजीजोबा, पणजी, सारा गोतावळा उभा राहिला. तो वाडा पाडण्याच्या कल्पनेने त्यांचे डोळे भरून आले.
मला नको असली वाड्याच्या मोबदल्यातील चोळीबांगडी. त्या तटकन म्हणाल्या. या विषयावर आज तरी काही बोलणे नको. ताईंची सही घ्यायला आलेले सारे खाली मान घालून निघून गेले, तरी ताई शांत बसून होत्या. त्यांच्या डोळ्यासमोर जुन्या काळातील वाडा तरळत होता, त्यातील माणसांसह. त्यांना आता कसलीच आसक्ती नव्हती. देवाने त्यांना भरभरून दिले होते. त्यांनी शांतपणे डोळे मिटून घेतले. अजूनही त्या अगदी निवांत होत्या…
अश्विनी महामुनी