संचारबंदी आदेश मोडल्याप्रकरणी भैरवगड येथील अठरा युवकांवर गुन्हा दाखल
नागठाणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदी व संचारबंदी आदेश लागू करूनही त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी भैरवगड ग्रुप ग्रामपंचात (ता. सातारा) येथील वाड्यांमधील सुमारे बारा युवकांविरुद्ध बोरगाव पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राज्यात करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करण्यात आला आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात जमावबंदी, संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सार्वजनिक कार्यक्रम व गर्दी करू नये असे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे. असे असतानाही भैरवगड ग्रुप ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येत असलेल्या गवळणवाडी व पिरेवाडी येथे काही युवक या आदेशाचे उल्लंघन करत होते.
शनिवारी दुपारी ग्रामसमितीचे पोलीस पाटील किरण फणसे, तलाठी रामचंद्र कुंभार, ग्रामसेवक नीलेश गुरव, सरपंच रामचंद्र साळुंखे यांनी गावात पाहणी केली असता पिरेवाडी येथे दौलत लक्ष्मण साळुंखे, विनायक उत्तम मोरे, वैभव प्रकाश मोरे, गणेश लक्ष्मण मोरे विनय प्रकाश शिंदे, शहाजी लक्ष्मण साळुंखे, सुमित रामचंद्र शिंदे, प्रतीक लक्ष्मण शिंदे,प्रेम बजरंग मोरे, अशोक भगवंत शिंदे, जगन्नाथ सखाराम शिंदे (सर्व रा. पिरेवाडी, ता. सातारा) हे युवक गावातील विठ्ठल-रखुमाई मंदिरात एकत्र झोपलेले आढळले. तर गवळणवाडी (ता. सातारा) येथे विजय ज्योतिराम झोरे, नवनाथ लक्ष्मण झोरे, धीरज आनंदराव झोरे, सूरज अशोक झोरे, विशाल कृष्णा झोरे, नितीन सर्जेराव झोरे, दिलीप लक्ष्मण माने हे युवक एकत्र फिरत असताना आढळले.या सर्वांविरोधात बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. हवालदार स्वप्नील माने तपास करत आहेत.
सरपंचांना दमदाटी
बोरगाव पोलिसांनी भैरवगड ग्रुप ग्रामपंचायती अखत्यारीत असलेल्या वाड्यांमधील युवकांवर कारवाई केल्याने गवळणवाडी (भैरवगड) येथील ग्रामस्थ शंकर जानू झोरे याने सरपंच रामचंद्र बाळू साळुंखे यांना “तुम्ही गावात पोलीस गाडी फोन करून बोलवून घेता, 15 तारखेनंतर तुला बघून घेतो’ अशी धमकी देत शिवीगाळ, दमदाटी करण्याची घटना घडली. याप्रकरणी बोरगाव पोलीस ठाण्यात शंकर जानू झोरे याच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.