माणूस सवयीचा (आणि मोबाइलचा) किती गुलाम आहे, ही गोष्ट मला त्या दिवशी चांगलीच पटली. आपण सर्व गोष्टी गृहित धरून चालत असतो. आणि त्या गृहितकांना धक्का बसला की गडबडून जातो. अर्थात गडबडून न जाणारे सुद्धा काही जण असतील. तो केवळ अपवाद म्हणायचा. बाकी सारे चाकोरीबद्ध. आपल्याच चाकोरीमध्ये फिरणारे. अगदी डोळ्यांना झापडे लावून किंवा डोळे मिटूनही. सूर्य पूर्वेलाच उगवणार ही गोष्ट आपण गृहित धरतो. समजा एखाद्या दिवशी तो चुकून पश्चिमेला उगवला तर? तर काहीही फरक पडणार नाही. कदाचित लोकांच्या ते लक्षातही येणार नाही. त्यांचे व्यवहार चालूच राहतील. त्यात फारसा फरक पडणार नाही.
सूर्याचे पूर्वेला उगवणे जसे आपण गृहित धरतो, तसेच आपले नेटवर्क चालूच राहील हे देखील आपण गृहित धरतो. पण समजा ते चालू राहिले नाही तर? तर केवढा गोंधळ होईल? सारे व्यवहार ठप्प होतील. आणि त्याहून महत्त्वाचे म्हणजे सतत हातात मोबाइल धरून त्यावर काही ना काही बघत-ऐकत-करत राहणाऱ्यांची केवढी पंचाईत होईल? जरा कल्पना करून बघा. साऱ्यांची खास करून युवावर्गाची केवढी तरी पंचाईत होऊन बसेल. त्यांना अन्नही गोड लागणार नाही. चैन पडणार नाही. धड झोप लागणार नाही.
डोळे असून आंधळ्यासारखी, कान असून बहिऱ्यासारखी त्यांची अवस्था होईल. सारी नेटवर्क्स बंद होण्याबाबत मला माहीत नाही, पण एक छोटी गोष्ट पाहिलेली. शेजारच्या वहिनींकडे गेले होते. तेथे वातावरण एकदम गंभीर दिसले. त्यांच्या मुलाच्या मोबाइलमध्ये काही तरी बिघाड झाला होता. डिस्प्लेच दिसेना. फोनचे, नव्हे स्मार्टफोनचे सारे व्यवहार बंद झाले. मेसेज-कॉल्सची आवक जावक बंद झाली. नेट बंद पडले. त्यामुळे व्हॉट्स ऍप, मेसेंजर, गूगल सारे ठप्प झाले. ही स्थिती त्या मुलाने जेमतेम पाच-दहा मिनिटे कशीबशी सहन केली. मात्र नंतर तो कमालीचा बेचैन झाला. ती बेचैनी त्याच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होती. खरं तर मोबाइल बंद पडल्याने काही इकडचे जग तिकडे होणार नव्हते. त्याच्या रोजच्या व्यवहारातील फारसे काही अडणार नव्हते. कारण एवढे अर्जंट म्हणावे असे संदेश किती आणि कोणाचे येतात दिवसभरात? कोणाशी काही महत्त्वाच्या कामाचे बोलायचे नव्हते, आणि जगभरात कोठे काय चालले आहे, तसल्या घडामोडी समजल्या नाहीत म्हणून तो काही उपाशी राहणार नव्हता.
पण तरीही त्याची अवस्था अगदी सैरभैर झाली. काही सुचेनाच त्याला. त्याची तशी अवस्था पाहून त्याची आई म्हणाली, बाळा, अरे असा काय अगदी हातपाय गाळून बसलास, मोठे नुकसान झाल्यासारखा. फोन बंद पडला म्हणून काय मोठे बिघडले? त्याच्यावाचून काही अडले आहे का? पण तो काही बोलला नाही. त्याची बेचैनी वाढत गेली. अखेर बंद पडलेला मोबाइल घेऊन तो दुरुस्त करून घेण्यासाठी बाहेर गेला.
24 तास हातात मोबाइल ठेवायची आणि त्यावर उगाचच सर्फिंग करायची, काही ना काही तरी पहायची, ऐकायची, पाठ्यवायची त्यात डोळे आणि डोकेही खूपसून बसायची सवय झाल्याने त्याला अशी बेचैनी आली. आणि अशी अवस्था असलेल्यांची संख्या फार मोठी आहे. त्या मोबाइलचे जणू व्यसनच लागल्यासारखे झाले आहे. जे सुटणे अशक्य नसले तरी महाकठीण कर्म झाले आहे.
आजकाल जग फार छोटे झाले आहे म्हणतात. पण ते आभासी झाले आहे. आधुनिक संस्कृतीमुळे माणसाचे जीवन कागदाच्या कृत्रिम फुलाप्रमाणे गंधहीन, रसहीन बनत चालले आहे. स्नेहशून्य, भावशून्य होऊ लागले आहे. नव्हे, झालेच आहे. ताण दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. मन:स्वास्थ्य हरवत चालले आहे. आणि जिथे मन:स्वास्थ्य नाही, तेथे शरीरस्वास्थ्य-आरोग्य कोठून येणार? परत मानसिक तणावांनी त्रस्त झालेल्या माणसासाठी बाहेरचे वातावरणही स्वास्थ्यप्रेरक कोठे आहे?
हा आधुनिक संस्कृतीचा शापच आहे असे म्हणायला हरकत नाही. हा शाप टाळण्यासाठी कालचक्र उलटे फिरवून पुन्हा मागील काळात जाणे शक्य नाही. पण अगदी ठरवून त्या स्मार्टफोनच्या आहारी जाणे कमी करता येणे शक्य आहे. किमान दिवसातील ठरावीक वेळ, महिन्यातील एखादा दिवस त्यापासून दूर राहायला हरकत नाही. आपण उपवास नाही का करत? तसाच प्रयत्न. किमान प्रयत्न करा. पाहा किती फरक पडतो जीवनात.
योगिता जगदाळे