तळागाळातील जनतेपर्यंत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची संघटनात्मक बांधणी करण्यासाठी कार्यकर्त्यांना वळसे पाटील साहेबांचे सातत्याने मिळणारे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. शांत, सुस्वभावी, अनुकरणीय, संयमी, अभ्यासपूर्ण, कायद्याची परिपूर्ण जाण, समाजाचे प्रश्न सोडविण्याची हातोटी, सर्वच क्षेत्रांबाबत असणारा विकासात्मक दृष्टिकोन या कार्यपद्धतीमुळे साहेबांचे राज्यात लाखो चाहते निर्माण झाले. साहेबांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे दाहीदिशा उजळून निघाले आहे. त्यासोबतच त्यांच्या परिघात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या अंगभूत गुणांचा परिसस्पर्श होऊन जीवनाचे सोने झाले आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःच्या आगळ्यावेगळ्या कार्यशैलीमुळे जनसामान्यांच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारे, कर्तृत्वाच्या जोरावर जनतेने स्वीकारलेले, असामान्य नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे आंबेगाव तालुक्याच्या विकासाचे शिल्पकार कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांचा वाढदिवस.
जनहितासाठी अहोरात्र झटणाऱ्या, मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासोबत राज्याला व देशाला दिशा देणारी भूमिका मांडणारे, राजकारणामध्ये विकासाची भूमिका ठळकपणे निर्माण करणारे, राज्याच्या पटलावरील सर्वच क्षेत्रांवर बुद्धीचातुर्याने उंच शिखरावर पोहचलेल्या, असामान्य पदावर पोहोचूनही विनम्रतेचे उत्तम उदाहरण असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाचा आज वाढदिवस. खऱ्या अर्थाने साहेबांचा वाढदिवस हा तमाम जनतेसाठी आनंदाचा दिवस असल्याचे म्हटलं तर वावगं ठरणार आहे. साहेबांना दीर्घायुष्य लाभावे हीच श्रीक्षेत्र भीमाशंकरच्या चरणी प्रार्थना. कष्टकरी, गोरगरिबांचा कैवारी, आदिवासी भागातील नागरिकांच्या जीवनमानात आमूलाग्र बदल घडविणारे, तालुक्याच्या वाडीवस्तीपर्यंत विकासाची गंगा पोहोचविणारे, तालुक्यातील जनतेला खऱ्या अर्थाने अच्छे दिन दाखविणारे साहेब, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रत्येक घरातील देव्हाऱ्यातील देवच जणू……
युवक दशेत असताना महाराष्ट्राचे आशास्थान, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे संस्थापक आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सान्निध्यात तयार झालेले हे शंभर नंबरी सोने, स्वकर्तृत्वाने राज्यात चमकले. वडिलांचा आशीर्वाद, संस्कार; पवार साहेबांचे राजकीय व सामाजिक गुण घेऊन समाजकारणात वावरणाऱ्या आमच्या नेत्याने खरोखरच “पुत्र व्हावा ऐसा त्याचा तिन्ही लोकी झेंडा’ हे ब्रीद सार्थ ठरविले. म्हणूनच ते केवळ आंबेगाव तालुक्याचाच नव्हे; तर संपूर्ण राज्याचा स्वाभिमान झाले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे यांच्यासमवेत राज्यभर दौरे करून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष मजबूत व्हावा, ही वळसे पाटील साहेबांची धडपड वाखाणण्याजोगी आहे. साहेबांच्या दूरदृष्टीपणामुळे भीमाशंकर साखर कारखाना नावलौकिकास आला. आंबेगाव तालुक्याबरोबरच राज्याच्या विकासात देखील साहेबांचे योगदान मोलाचे आहे. राष्ट्रीय नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विचारांना मानणाऱ्या शेतकरी वर्गाने कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील साहेबांवर देखील जीवापाड प्रेम केले.
भीमाशंकर सहकारी साखर कारखाना, शरद सहकारी बॅंक, गोवर्धन समूह, अवसरी येथील शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज, मंचर उपजिल्हा रुग्णालय यामुळे आंबेगाव तालुक्यालाच नव्हे; तर जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे. लाखणगाव गावाच्या सर्वांगीण विकासासाठी कामगार आणि उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, पंचायत समितीचे सभापती संजय गवारी यांचे योगदान मोठे आहे. अशा या उत्तुंग, स्वकर्तृत्वाने गरूडझेप घेतलेल्या, जनमानसावर अधिराज्य केलेल्या आदर्श लोकसेवकास वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
– जयश्रीताई विनोदशेठ मोढवे,
साकोरे ता. आंबेगाव