नसरापूर – ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विकास व्हावा, आणि त्यांच्यातील गुण ओळखून त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळावे यासाठी उन्नत भारत अभियान व उन्नत महाराष्ट्र अभियाना अंतर्गत किकवी (ता. भोर) येथे कौशल्य विकास केंद्र सुरु करण्यात आले आहे.
पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे जिल्हा परिषद, भोर पंचायत समिती, ग्रामपंचायत किकवी व छत्रपती शिवाजी विद्यालय किकवी यांच्या संयुक्त विद्यमाने कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात आले.
“कौशल्य विकास केंद्रात विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक, प्लंबिंग, मोबाईल रिपेअरिंग, सुतारकाम, कॉम्प्युटर आदीचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत शाळेस प्रशिक्षणासाठी कॉम्प्युटर लॅब सुरु केली असल्याचे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक बी. बी. अहुजा यांनी सांगितले. ” तसेच औषधी वनस्पती उद्यानाचे देखिल उद्घाटन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
या प्रसंगी विस्तार अधिकारी राजेंद्र चांदगुडे, पंचायत समिती सदस्य रोहन बाठे, सरपंच नवनाथ कदम, उपसरपंच संजय राऊत, दत्तात्रेय भिलारे, दीपाली काकडे, प्रशांत कोंढाळकर, राजेंद्र भोसले, राजेंद्र निगडे, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ. राजेंद्र रांजेकर, डॉ. जतिन मिजिठिया, पराग सदगीर, अर्चना ठोसर, डॉ. महेश शिंदीकरयांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापिका ज्योती हजारे यांनी केले. तर सूत्रसंचालन मिलिंद मगर यांनी केले. आभार ग्रामसेवक भूषण पुरोहित यांनी मानले.