करोना संचारबंदी : तीन जिल्ह्यांतील 600 कार्यक्रम अधिकारीही सहभागी होणार
पुणे – करोना विषाणू संसर्गाच्या आपत्तीमुळे संपूर्ण संचारबंदी व बहुतांश व्यवहार बंद असल्याने सरकारी यंत्रणांवर प्रचंड ताण पडत आहे. अशा वेळी शासकीय यंत्रणांना सहकार्य करण्यासाठी आणि नागरिकांना विविध गोष्टींसाठी मदत करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे (एन.एस.एस.) तिन्ही जिल्ह्यांमधील (पुणे, नाशिक व अहमदनगर) 60 हजार विद्यार्थी कार्यरत होणार आहेत. या संदर्भात कुलगुरू प्रा. नितीन करमळकर यांनी संबंधित अधिकारी व सदस्यांशी चर्चा करून याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.
राज्यात संचारबंदीमुळे यंत्रणांना विविध कामे करण्यासाठी स्वयंसेवकांची गरज आहे. तसेच, विशेषत: ज्येष्ठ नागरिक व अनेक कुटुंबांना विविध प्रकारच्या गोष्टींसाठी मदतीची आवश्यकता आहे.
एन.एस.एस.चे 600 कार्यक्रम अधिकारीही त्यात सहभागी होणार आहेत. यात यंत्रणांकडून विविध घटकांसाठी जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले जात आहे. या वितरणव्यवस्थेत यंत्रणांना मदत करणे, वंचित घटकांना बॅंकांमध्ये त्यांच्या गरजेनुसार विविध प्रकारची मदत करणे. योजनांचा लाभ पोहचवणे, पोलीस मित्र म्हणून काम करणे. पोलिसांच्या गरजेनुसार पोलीस ठाण्यांमध्ये किंवा त्यांच्या मदत केंद्रात सहकार्य करणे, महसूल यंत्रणेसोबत जोडले जाणे. रक्तदानासाठीच्या फिरत्या व्हॅन चालवणे. सॅनिटायझर व मास्क निर्मिती करण्यासोबतच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे, ही उत्पादने तयार करून आरोग्य सेवकांना पुरविण्याची जबाबदारीसुद्धा हे विद्यार्थी घेणार आहेत.
दरम्यान, या संदर्भात कुलगुरू प्रा. करमळकर यांनी व्यवस्थापन परिषद, अधिसभा, विद्या परिषद यांचे काही सदस्य तसेच, एन.एस.एस.चे कार्यक्रम अधिकारी अशा तब्बल 100 जणांशी दूरसंवाद (टेलि-कॉन्फरन्सिंग) साधला. त्यातून आलेल्या सूचनांनुसार हा ठोस कार्यक्रम राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
सहा लाख कुटुंबांपर्यंत पोहोचणार
एन.एस.एस.चे हे 60 हजार विद्यार्थी प्रत्येकी दहा गरजू कुटुंबांशी जोडले जाणार आहेत. त्याद्वारे तब्बल 6 लाख कुटुंब आणि तब्बल 25लाख लोकांपर्यंत हे विद्यार्थी जोडले जाणार आहेत. त्या माध्यमातून या वंचित घटकांच्या गरजा व आरोग्याच्या समस्या, आदी गोष्टी थेट संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवण्याचे काम करणार आहेत. यातून या संचारबंदीच्या काळात घटकांच्या समस्यांचे निराकरण होण्यास मदत होऊ शकेल.
राज्य व देश इतक्या मोठ्या आपत्तीशी लढत असताना विद्यापीठाने समाजात जाऊन थेट मदत करणे अपेक्षित आहे. याबाबत विद्यापीठाशी संबंधित सर्व अधिकारी, पदाधिकारी यांच्या सकारात्मक भावना आहेत. त्यामुळे हा ठोस कार्यक्रम घेऊन आम्ही समाजात जात आहोत. हा आमचा वाटा यंत्रणांवरचा ताण काही प्रमाणात कमी करण्याचा आणि समाजाला दिलासा देण्याचा एक प्रयत्न आहे.
– प्रा. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ