कार्ला (वार्ताहर) –पुणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन व मावळ तहसील आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर लॉकडाऊन शिथिल झाल्याने परराज्यातील स्थलांतरीत मजूर गावाच्या ओढीने पायी चालत जाणाऱ्या नागरिक व स्थलांतरीत मजुरांसाठी विश्रांतीगृह सुरू करण्यात आले आहे. मावळ तालुक्यात अशी सहा विश्रांतीगृह सुरू केली असल्याचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी सांगितले.
करोनाच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीय व अनेक जिल्ह्यातील मजूर आपल्या घराच्या ओढीने राष्ट्रीय महामार्गावरुन चालत प्रवास करत असल्याने उन्हाची तीव्रता अधिक असल्याने अशा मजुरांना विश्रांती करण्यासाठी मावळचे तहसिलदार मधुसुदन बर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुक्यात एकूण सहा विश्रांतीगृह सुरू केली असून, कार्ला फाट्यावर सामाजिक कार्यकर्ते अशोक म्हाळस्कर यांच्या जागेत सध्या हे विश्रांतीगृह सुरू केले आहे.
या विश्रांतीगृह ठिकाणी मजुरांना सकाळी नाष्टा, दुपारचे जेवन, चहा, संध्याकाळ जेवन तसेच शौचालय व अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या साठी कार्ला मंडल अधिकारी माणिक साबळे, कार्ला तलाठी दिलीप राठोड, कार्ला ग्रामसेवक सुभाष धोत्रे, अशोक म्हाळस्कर, किरण हुलावळे, गणेश टिळेकर, शुभम मावकर, सुनील सावळे, ऋषीकेश म्हाळस्कर विशेष परिश्रम घेत आहेत.