दुरुस्तीविषयी उदासीनता : नवीन पूल उभारणीनंतरच वाहतूक शक्य
कामशेत – पवन मावळातील थुगाव-बौर या रस्त्यांना जोडणारा पवना नदीवरील पूल धोकादायक झाल्याने 15 ऑगस्टला वाहतुकीस बंद करण्यात आला होता. त्यानंतर अद्याप त्या पुलाच्या डागडुजीचे काम करण्यात आलेले नाही. थुगाव येथील हा पूल पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत आहे. मात्र हा वाहतुकीसाठीचा पूल नसून, आमचा बंधारा आहे. आणि वाहतुकीसाठी जिल्हा परिषदेने वेगळा पूल बनविणे गरजेचे आहे, असे पत्र पाटबंधारे विभागाकडून जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागास वारंवार देण्यात आले आहे. देखील त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने आता नक्की पूल बांधायचा कोणी असा प्रश्न उपस्थित होते आहे.
थुगाव येथील पवना नदीवरील पूल (बंधारा) 50 वर्षांहून अधिक जुना झालेला आहे. धोकादायक झालेल्या या पुलाची डागडुजी करून पाटबंधारे विभाग दिवस ढकलत होते; मात्र ऑगस्ट महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पवना नदीला आलेल्या पुरात या पुलाचे तीन स्थंभ (पिलर) वाहून गेल्याने पूल धोकादायक झाला. त्यानंतर पाटबंधारे विभागाकडून 15 ऑगस्टपासून हा पूल वाहतुकीस बंद करण्यात आला.
पुलावरून वाहतूक बंद केल्याने परिसरातील आठ गावांतील नागरिकांना दहा किलोमीटरचा वळसा घालून बौर गावात जावे लागते आहे. बौर गावात असणाऱ्या कंपनीमध्ये परिसरातील बरेच लोक काम करतात. पूल बंद झाल्याने दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कंपनीत जाण्यासाठी कामगारांना दहा किलोमीटरचा वळसा घालावा लागतो आहे. यामुळे कामगारांच्या वेळेचा व पैसाच अपव्यय होत आहे. कामगार विद्यार्थी, दुग्धव्यवसायिक व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी हा पूल त्वरित दुरुस्त करणे आवश्यक आहे. मात्र पूल बंद करून सहा महिने उलटले. तरी देखील पाटबंधारे विभागास अद्याप पुलाच्या कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यात यश आले नाही. यामुळे गेल्या सहा महिन्यात पाटबंधारे विभागाने काय केले असा प्रश्न निर्माण झाला आहे.
“पीडब्ल्यूडी’, “झेडपी’चे दुर्लक्ष
पवना नदीवरील पूल (बंधारा) वाहतुकीसाठी नसून, पाणी अडविण्यासाठी आहे. मात्र जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागाने याच्या दोन्ही बाजूने रस्ते जोडल्याने या बंधाऱ्याचा पूल म्हणून वाहतुकीसाठी वापर होऊ लागला आहे. मात्र या बंधाऱ्यावरून अवजड वाहनांची वाहतूक होईल. एवढी या बंधाऱ्याची क्षमता नसल्याने 2017 पासून पाटबंधारे विभागाने जिल्हा परिषद व सार्वजनिक बांधकाम विभागास वेळोवेळी पत्र देऊन याची माहिती दिली. वाहतुकीसाठी पर्यायी पूल बांधण्याचे देखील सुचविले आहे. पण सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेने याकडे दुर्लक्ष केले आहे.
थुगाव येथील पुलाचे अंदाजपत्रक तयार करून मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे. पण दुरुस्तीनंतर देखील पुलावरून अवजड वाहनांना वाहतूक करता येणार नाही. यासाठी स्वतंत्र पूल बनविण्याची आवश्यकता आहे. आम्ही वेळोवेळी याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेस दिली आहे.
– अशोक शेटे, विभागीय अभियंता, पाटबंधारे विभाग.