जयपुर – राजस्थानातील श्रीगंगानगर जिल्ह्यात आज एका जीपची ट्रकशी धडक होऊन झालेल्या अपघातात सहा जण ठार झाले तर अन्य सात जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. या जिल्ह्यातील राजीयसार येथे ही घटना घडली.
जीप हनुमानगढ जिल्ह्यातील सांगरिया गावाकडे चालली होती. त्यावेळी तिची ट्रकशी धडक झाली. या ट्रकला मागे ट्रॉली बांधली होती. त्या ट्रॉलीला ही जीप धडकली असे सांगण्यात येते. जीपचा वेग भरधाव होता. त्यामुळे चालकाला त्यावर नियंत्रण मिळवता आले नाही.
त्यातच जीप मध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवण्यात आले होते. ही धडक इतकी जबरदस्त होती की, त्यात सहा जण जागीच ठार झाले. जखमींना जवळच्याच रूग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे.