अकोला: अकोला येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सहा शेतकऱ्यांनी विष प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. धुळे-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरच्या विस्तारीकरणात या शेतकऱ्यांची शेती गेली. गेल्या दोन वर्षांपासून या सगळ्यांना योग्य मोबदला देण्यासाठी टाळाटाळ केली जात आहे. तसेच सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना वाढीव मोबदला मिळणार नसल्याचं पत्र दिलं. त्यामुळे त्यांनी असा आत्मघातकी निर्णय घेतल्याची माहिती मिळत आहे. विष प्राशन केलेल्या या सर्व शेतकऱ्यांची प्रकृती गंभीर आहे. अतिरीक्त जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांच्यासमोर हा सर्व प्रकार घडला.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या प्रचार दौऱ्यातून थोडा वेळ मिळाला तर या शेतकऱ्यांकडे व त्यांच्या मागण्यांकडे जरा लक्ष द्या. मतांच्या जोगव्यासाठी दौरा करताना बळीराजाकडे दुर्लक्ष कराल तर राज्यातील जनता तुम्हाला कधीही माफ करणार नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे.
अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथी सहा शेतकऱ्यांनी जिल्हधिकारी कार्यालयात विष प्रश्न केले. साजिद इकबाल शेख मेहमूद, अब्जल रंगाली, अर्चना टकले, मुरलीधर राऊत, आशिष हिवरकर, अबरार रोशन अहमेद अशी विष पिलेल्या शेतकऱ्यांची नावं आहेत. दरम्यान, यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.