सोलापूर – उजनी आणि वीर धरणातून पाण्याचा विसर्ग निरा व भीमा नदी पात्रात होत असल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीच्या पाणी पातळीत सतत वाढ होत आहे. पंढरपूर तालुक्यातील सहा बंधारे व एक पूल पाण्याखाली गेला आहे. यामुळे येणाऱ्या संभाव्य पूर परिस्थितीवर मात करण्यासाठी तसेच जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज असून चंद्रभागा नदीत दोन बोटींची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती पंढरपूरचे प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.
संभाव्य आपत्तीचा धोका लक्षात घेऊन पंढरपूर तालुक्यात गाव पातळीवर तसेच पंढरपूर शहरात आपत्ती निवारणार्थ यंत्रणा गतिमान झाली आहे. यापूर्वीच्या धोक्यांचा अभ्यास करून त्या ठिकाणी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील नदीवरील सहा बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच नदीवर चार पूल असून त्यापैकी दगडी पूल पाण्याखाली आहे. नदीकाठावरील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे.
आपतकालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी लोकसहभाग ही महत्त्वाचा असल्याचे प्रांताधिकारी गुरव यांनी सांगितले. चंद्रभागा नदीपात्रात पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे आपत्ती व्यवस्थापनांतर्गत महसूल व नगरपालिका प्रशासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
चंद्रभागा नदीत दोन रबरी मोटार बोटिंगची व्यवस्था करण्यात आली असून लाईफ जॅकेट्स, फ्लोटिंग रिंग ,रोप, सर्च लाईट, ध्वनिक्षेपक, रेस्क्यू किट इत्यादी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असून चंद्रभागा नदी काठावरील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.