लाखणगाव (वार्ताहर) – निसर्ग चक्रीवादळामुळे आंबेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पूर्व भागातील ऊस पिकाला जबर तडाखा बसला आहे. यात आठ ते नऊ महिने वयाचे उसाचे पीक जमीनदोस्त झाले आहे. ऊस जमीनीवर लोळत असल्याने उत्पादन घट होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
तालुक्याच्या पूर्व भागातील ऊस, तरकारी पिके, जनावरांचा चारा यांचे मोठे नुकसान झाले. तसेच घर, गोठे, निवारा शेड, कांदाचाळी यांचेही नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका ऊस पिकाला बसला आहे. या ठिकाणी भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असल्याने उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. येथील शेतकऱ्यांचे ऊस हे मुख्य पीक असून ज्या शेतकऱ्यांनी मागील जुलै-ऑगस्टमध्ये उसाची लागवड केली होती. असा आठ ते दहा महिने वयाचा ऊस निसर्ग चक्रीवादळाने भुईसपाट झाला आहे.
काही ठिकाणी ऊस उन्मळून पडला आहे. अजूनही ऊस कारखाने सुरू होण्यासाठी चार महिन्यांचा अवकाश आहे. त्यामुळे चार महिन्यांपर्यंत उसाची तोडणी होणार नाही. परिणामी ऊस भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होणार आहे. ऊस सपाट झाल्याने वाढीवरही परिणाम होणार आहे उसाला पाणी देणे, खते देणे हेही अडथळ्याचे ठरणार आहे. इतर तरकारी पिकांची बाजारभावाची असलेली दोलायमान स्थिती त्यापेक्षा उसाचे उत्पादन हमखास मिळते. म्हणून शेतकरी उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर करतात. प्रत्येक शेतकरी कमी जास्त प्रमाणावर ऊस पिक घेतो. म्हणून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.