तालुक्यातील दुष्काळी स्थितीमुळे फळांचे उत्पादन कमी : शेतकरी चिंतेत
खळद – पुरंदर तालुक्यातील फळबागांना दुष्काळस्थितीचा फटका बसला आहे. यामध्ये ज्या शेतकऱ्यांची फळे राहिली, त्यांना बाजारपेठेत सध्या चांगला दर मिळत आहे. मात्र, सासवड येथील बाजारात आवक कमी होत असल्याने फळांचे दरही वाढले आहेत. तालुक्यातील सहताफळांचे उत्पादन तर निम्यांने कमी झाले आहे.
सहकारी आणि खासगी तत्त्वावर पुरंदर तालुक्यात सहताफळ पल्प निर्मितीचा उद्योग चालतो. शिवाय तालुक्यातून सीताफळ खरेदी करून अन्यत्र पल्पकरिता पाठविणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु, यावर्षी दुष्काळीस्थितीमुळे सीताफळांचे उत्पादन कमी निघत आहे. त्यातही प्रतवारी केल्यास हाती येणारा माल दर्जेदार नाही. यामुळे नं. 1 च्याच मालाला चांगला दर मिळत आहे.
पुरंदर तालुक्यात बागायती क्षेत्र व सिंचनक्षेत्र कमी आहे. यामुळे फळ पिकाचे क्षेत्र वाढले होते.
अंदाजीत सात हजार 350 हेक्टरवर सीताफळ तसेच अंजीर बागा होत्या. यामध्ये चिक्कू व डाळींब या फळ पिकांचाही समावेश होता. पुरंदर तालुक्यात केवळ सीताफळाखालील क्षेत्र साधारण 2 हजार 50 हेक्टर असल्याचीही नोंद कृषी खात्याकडे आहे. मात्र, गेल्या दोन वर्षात यामध्ये घट झाली आहे. दुष्काळी स्थितीमुळे फळबागा मोडणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. याच कारणातून सासवडच्या बाजारात सीताफळांची आवक मंदावली आहे. याचाच परिणाम म्हणून दर वाढत आहेत; परंतु चांगला माल कमी प्रमाणात मिळत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
अंजीर उत्पादनही घटणार…
पुरंदर तालुक्यात अंजिराचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र, अंजीर हे फळ अत्यंत नाजूक असल्याने दुष्काळी स्थितीत अंजीर बागा पाण्याअभावी जळाल्या आहेत आणि फळे गळून देखील पडली आहेत. आलेल्या फळांनाही नुकत्याच झालेल्या पावसाचा फटका बसल्याने यंदा अंजीर उत्पादनातही घट होणार आहे. दिवे भागात सर्वाधिक अंजिर उत्पादन घेतले जाते, तेथील बागाही दुष्काळात होरपळत आहेत. आधीच दुष्काळाने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना तालुक्यातील फळबागांची चिंता मोठ्या प्रमाणावर भेडसावू लागली आहे.