नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून दिल्ली सरकारच्या २०२३-२४ साठी सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पावर स्थगिती लावण्यात आली आहे. दरम्यान, केंद्राच्या या निर्णयावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले असून यात त्यांनी अर्थसंकल्पावर स्थगिती न लावण्याची विनंती केली आहे.
देशाच्या ७५ वर्षांच्या इतिहासात पहिल्याच एखाद्या राज्याचा अर्थसंकल्प थांबवण्यात आला आहे. यावरूनच आता अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून हि स्थगिती मागे घ्यावी असे म्हटले आहे. यासाठी त्यांनी लिहिलेल्या पत्रात, “महोदय, तुम्ही दिल्लीकरांवर का नाराज आहात?, कृपया, दिल्लीचे बजेट थांबवू नका” असे म्हटले आहे. तसेच दिल्लीकर तुमच्याकडे हात जोडून विनंती करत आहेत कि तुम्ही हे बजेट रोखू नका आणि आमच्या बजेटला मंजुरी द्या, अशी मागणी केली आहे.
तर दुसरीकडे गृह मंत्रालयाने दिल्लीच्या आप सरकारला त्यांनी बजेटमध्ये जाहिरातींवर अपेक्षित खर्चाच्या जास्त खर्च का केला असा सवाल केला आहे तसेच याचे स्पष्टीकरण देखील मागितले आहे. तर यावर आप सरकारने गृह मंत्रालयावरच आरोप करत असा कोणताही जास्त खर्च झाला नसून मंत्रालय चुकीची माहिती पुढे आणत असल्याचे म्हटले आहे.
बजेटमध्ये तब्बल ७८८०० कोटींचा समावेश असून त्यातील २२००० कोटी हे विकास कामांसाठी वापरण्यात येणार असून जाहिरातींसाठी केवळ ५५० कोटींचा खर्च करण्यात येणारआहे ज्यामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणावर आता गृहमंत्रालयाने जोपर्यंत आप सरकार यावर स्पष्टीकरण देत नाही तोपर्यंत हे प्रकरण पेंडिंग राहणार असल्याचे म्हटले आहे.