हिंगोली (प्रतिनिधी) – हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातल्या पळशी गावातील तरुण शेतकऱ्याने हिंगोलीचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना पत्र लिहून पूर्ण कुटुंबाला इच्छा मारण्याची परवानगी द्यावी, अशी अजब मागणी केली आहे. यामुळे तरुणाच्या या पत्राने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. पंडित पांडुरंग खिल्लारे असे या तरुणाचे नाव असून, पळशी गावचा हात करून रहिवासी आहे.
तरुणांनी या पत्रात म्हटल आहे की, सततची नापीकी व अतिवृष्टी यामुळे सावकारी कर्ज, बँक कर्ज व शासनाच्या या सुलतानी धोरणामुळे मी अत्यंत वाईट व हलाकीच्या परिस्थितीमध्ये जीवन जगत आहे.
एक जुलै 2022 ते दिनांक 15 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये संततदार पावसामुळे माझी शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली होती. यातच माझ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे माझ्यावर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.
शासनाने राजकीय द्वेषापोटी आमची काही मंडळे दुष्काळी अनुदानापासून वंचित ठेवली आहे. यामुळे आमच्या शेतकऱ्यावर खूपच अन्याय झाला आहे.
आतापर्यंत शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे तर सोडाच पण कोणतेही कर्मचारी अधिकारी फिरकले सुद्धा नाही.
अशा दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. शासनाची अनास्थांत व भेदभाव जन्य भूमिका असेल तर कृपया मला व माझ्या परिवाराला शासनाने इच्छा मरणाची परवानगी द्यावी ही मी कळकळीची विनंती करतो.
या शिवाय माझ्यासमोर कोणताही पर्याय उपलब्ध नाही, असं या तरुणाने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
ओल्या दुष्काळाच्या अनुदानाच्या मुद्द्यावरून हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी आता आक्रमक झाल्याचे बघायला मिळते आहे. विविध स्तरावर आंदोलनाची तयारी शेतकऱ्यांनी दर्शवली आहे.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनावर काय तोडगा निघणार,राज्याचे मुख्यमंत्री याबाबत काय भूमिका घेणार याकडे राज्यातील संबंध शेतकऱ्याचे लक्ष लागले आहे.