खडकवासला – जिल्ह्याधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी करोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटनस्थळे, धरण परिसर व गडकिल्ले आदी ठिकाणी संचारबंदी लागू केली आहे. परंतु, या आदेशाची अंमलबजवणी सिंहगड वनविभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून होत नसल्याने सिंहगडवर पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
पायथ्याशी नाकाबंदीसाठी व गडावर बंदोबस्तासाठी असलेले वनसमीतीचे कर्मचारीच जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेले नियम मोडीत काढत आहेत. पर्यटकांना “सोयीस्करपणे’ गडावर सोडले जात आहे. विशेष म्हणजे पर्यटकांना त्यांची खासगी वाहने बाजूला लावून पायथ्यापासून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांतून येणे-जाणेचे 150 ते 170 रुपये घेऊन गडावर सोडले जात आहे, अशा वाहनांतून येणाऱ्या पर्यटकांनाच गडावर दरवाजा बंद करून बसलेले कर्मचारी प्रवेश देतात. चालत येणाऱ्या किंवा स्वतःच्या वाहनाने गडावर आलेल्या पर्यटकांची मात्र अडवणूक करण्यात येत आहे. या “कारभारा’ची चौकशी करण्याची मागणी अडवणूक झालेल्या पर्यटकांकडून होत आहे.
सिंहगडावर पर्यटक सोडण्याकामी काही कर्मचाऱ्यांचा सहभाग दिसत आहे. कोणत्याही प्रकारची वाहने तसेच पर्यटकांना गडावर सोडू नये, अशा स्पष्ट सूचना वनकर्मचाऱ्यांना दिलेल्या आहेत. कोणी गैरप्रकार करीत असतील त्यांची नावे अधिकाऱ्यांना कळविण्यात येतील. – बाळासाहेब जिवडे, वनरक्षक, घेरा सिंहगड