पुणे– समाजातील हजारो अनाथ-निराधार मुलांना आधार देत त्यांना शिक्षण देऊन आयुष्य जगण्यासाठी सक्षम बनविणाऱ्या सिंधूताईंचे जाणे सर्वांनाच हुरहुर लावणारे आहे. सिंधूताई यांनी समाजसेवेच्या व्रतातून जो वटवृक्ष उभारला,
त्याच समाजोपयोगी कार्यात दैनिक “प्रभात’नेही खारीचा वाटा उचलत समाजाप्रती आपले योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. प्रभात’ने केलेल्या या कार्याची जाणीव सिंधूताई यांनी अखेरपर्यंत ठेवली. इतकेच नव्हे, तर अनेक कार्यक्रमांत सिंधूताई सपकाळ यांनी आवर्जून “प्रभात’च्या योगदानाचा उल्लेख केला आहे.
सिंधूताई सपकाळ यांनी अनाथ, निराधार मुलांसाठी केलेल्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर केला होता. त्याप्रसंगी प्रभात’ने सिंधूताई यांच्याशी संवाद साधला असता, सिंधूताईंनी “प्रभात’शी असलेल्या आठवणींना उजाळा दिला.
या मुलाखतीदरम्यान सिंधूताई म्हणाल्या, ज्यावेळी मी माझ्या 16 लेकरांना घेऊन पुण्यात आले होते आणि कुंभारवळण (ता. पुरंदर) येथे माझ्या पहिल्या मुलाच्या जागेत झोपडी बांधून राहत होते,
त्यावेळी “प्रभात’चे अशोक गांधी तिथे येऊन गेले. ते सोलापूरकडे चालले होते आणि नकळतपणे आमच्या येथे येऊन त्यांनी पाहिले. त्यानंतर त्यांनी आणि त्यांची मावशी वासंतीबेन शहा यांनी मला घर बांधून दिले. पुण्यातून मला मिळालेले ते पहिले योगदान होते. त्यामुळे माझी बेघर, झोपडीत असलेली मुले घरात नेण्याचे काम “प्रभात’ने,
अशोक गांधींनी आणि त्यांच्या मावशींनी केले आहे. यासाठी मी कायम त्यांची ऋणी राहीन. “प्रभात’ आणि अशोक गांधी यांनी मला धीर दिला. मी त्यांना विसरू शकणार नाही. आता त्यांची हीच परंपरा आनंद गांधी हे सांभाळताहेत, की कौतुकास्पद बाब आहे.’