सिंधुदुर्ग – कुडाळ येथे उभारण्यात येत असलेले माच्छिंद्र कांबळी यांचे स्मारक १ वर्षात पूर्ण होणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत यांंनी केले.
मच्छिंद्र कांबळी यांच्या रेवंडी या गावी मोबाईल टॉवरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. जिल्ह्यात मंजूर झालेल्या बी.एस.एन.एल. च्या एकूण 104 टॉवरपैकी 67 व्या टॉवरचे आज उद्घाटन झाले. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, संजय पडते, जि.प. सदस्य नागेंद्र परब, सरपंच प्रिया कांबळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणावरही टीका करण्यापेक्षा विकासकामे महत्त्वाची असल्याचे सांगून पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, सी.आर.झेड.बाबत ग्रामस्थांच्या मागण्या व म्हणणे याबाबत शिफारस करू. स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे ही माझी भुमिका आहे. गावातील सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहोत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंधुदुर्गसोबत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयासाठी मी त्यांचे आभार मानतो. चांगले वाईट जिल्हावासियांना समजते. मी ही सिंधुदुर्गचा सुपुत्र आहे. त्यामूळे जिल्ह्याच्या विकासासाठी मी कटिबद्ध असल्याचे पालकमंत्री सामंत म्हणाले.