कोलकता – कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते अधिररंजन चौधरी यांनी बुधवारी पत्रप्रपंच करून पक्षात अस्वस्थता निर्माण करणाऱ्या सहकाऱ्यांना फटकारले. केंद्रात कॉंग्रेस सत्तेत नसल्यानेच पक्षातून वेगळे सूर उमटत आहेत. पक्ष सत्तेत असता तर तसे घडले नसते, असे अधिररंजन यांनी म्हटले.
कॉंग्रेसच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र पाठवले. त्यातून त्यांनी पक्षात संघटनात्मक पातळीवर तातडीने सुधारणा करतानाच पूर्णवेळ अध्यक्ष निवडण्याची मागणी केली. त्यामुळे पत्रप्रपंच करणाऱ्या नेत्यांनी पक्ष नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे चित्र निर्माण झाले.
त्याशिवाय, कॉंग्रेसमध्ये मतभेद असल्याच्या चर्चांनाही तोंड फुटले. त्यानंतर पत्रप्रपंच करणारे नेते स्वपक्षीयांच्या निशाण्यावर आले. आता अधिर यांनीही पत्र पाठवणाऱ्या नेत्यांना खडे बोल सुनावले आहेत. पक्षाच्या कामकाजावर आता जे प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत; ते संबंधित व्यवस्थेचे अनेक दशके अविभाज्य भाग होते. त्या व्यवस्थेचे ते लाभार्थीही ठरले, असे अधिररंजन म्हणाले.
सोनिया आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे नेतृत्व देशव्यापी आहे. केवळ तेच कॉंग्रेसला एकजूट ठेऊ शकतात. पक्षाकडे गांधी परिवाराव्यतिरिक्त पर्याय नाही. पक्षाच्या निवडणुकीतील पीछेहाटीचा संपूर्ण दोष त्यांच्यावर ठेवणे पूर्णपणे चुकीचे आहे, अशी भूमिकाही अधिर यांनी मांडली.