भोपाळ – गेल्या कित्येक दिवसांपासून आपण मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे भेटीची वेळ मागत आहोत, पण ते मला भेटण्याची वेळच देत नाहीत. त्यांनी मला जर 20 जानेवारीपर्यंत भेटण्याची वेळ दिली नाही तर त्यांच्या सरकारी निवासस्थानाच्या बाहेर आपण धरणे आंदोलन करू असा इशारा ज्येष्ठ कॉंग्रेस नेते दिग्विजयसिंह यांनी दिला आहे.
ते म्हणाले की टेम आणि सुथालिया पाटबंधारे प्रकल्पामुळे लोकांना ज्या समस्या येत आहेत त्याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायची आहे त्यासाठी मला त्यांची वेळ हवी आहे. त्यांच्या भेटीसाठी मी गेल्या एक महिन्यापासून प्रयत्न करतो आहे.
तसे पत्रही मी त्यांना लिहीले आहे. पण मुख्यमंत्री या प्रश्नाशी संबंधीत जनता आणि शेतकऱ्यांविषयी असंवेदनशील आहेत असा आरोपही दिग्विजयसिंह यांनी केला आहे. या दोन प्रस्तावित धरणांमुळे शेतकऱ्यांच्यापुढे समस्यांचा डोंगर उभा राहिला आहे. त्यांच्या प्रश्नावर मी स्वत: मुख्यमंत्र्यांना अनेकवेळा पत्र लिहूनही त्यांनी त्याची दखल घेतलेली नाही असे त्यांनी म्हटले आहे. या दोन धरणांमुळे शेतकऱ्यांची हजारो एकर जमीन पाण्याखाली जाणार असल्याची लोकांची तक्रार आहे.