नवी दिल्ली : व्होडाफोन-आयडिया किंवा एअरटेलच्या ग्राहकांना मोबाईलवर बोलण्यासाठी अतिरीक्त खर्च करण्याची वेळ आता जवळ आली असल्याचे दिसत आहे. कारण एक डिसेंबर 2019 पासून मोबाइलवर बोलण्यासाठी जास्त खर्च करावे लागणार असल्याची घोषणा केली आहे. आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेलने एक डिसेंबरपासून मोबाइल सेवांचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, दोन्ही कंपन्यांनी सध्या तरी प्रस्तावित शूल्क वाढीशी निगडित माहिती दिलेली नाही. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते आगामी काळात जिओ ग्राहकांनाही यावर अधिक खर्च करावा लागेल.
त्यामुळे कॉल जोडण्याचे शूल्क (आययूसी) बंद होणार नाही. दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) या वादग्रस्त मुद्द्यावर या महिनाअखेर आपले मत देण्याची आशा आहे. व्होडाफोन, आयडिया आणि एअरटेलच्या विरोधामुळे हे शूल्क कायम राहण्याची शक्यता आहे. तर रिलायन्स जिओने आययूसी शूल्क संपवण्याची तारीख एक जानेवारीच्या पुढे ढकलली तर निशूल्क व्हाईस कॉल्सचे युग संपेल आणि शूल्क दरांत वाढ होऊ शकते, असे म्हटले आहे.
दरम्यान, व्होडाफोन-आयडियाला चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 50,922 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. एखाद्या भारतीय कंपनीचा एका तिमाहीतील हे सर्वांत मोठे नुकसान आहे. एअरटेलला चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत 23,045 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.