नियमाचे उल्लंघन करणाऱ्यास 4 हजाराचा दंड
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत धोकादायक स्तरावर प्रदूषणाची पातळी पोहचली आहे. त्यामुळे दिल्लीत सोमवारपासून सम-विषम योजना लागू केली जाणार आहे. या अंतर्गत सोमवारी दिल्लीत ज्या वाहनांच्या अखेरीस 0,2,4,6,8 हा क्रमांक असेल. तीच वाहने दिल्लीतील रस्त्यावर धावतील. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना चार हजार रुपयांचा दंड करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Odd-even vehicle scheme comes into force in Delhi, it will continue till 15th November. pic.twitter.com/p3fLKxJcn9
— ANI (@ANI) November 4, 2019
सम-विषमची योजना सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत लागू राहिल. सम-विषममधून रविवार वगळण्यात आला आहे. यावेळीही सम-विषम योजनेतून महिलांना सूट देण्यात आली आहे. कोणतेही वाहन चालवत असलेल्या महिलेला या सम-विषम योजनेतून सूट मिळेल. या वाहनात पुरुष प्रवासी नसला पाहिजे ही अट आहे. महिलांबरोबर 12 वर्षां पर्यंतच्या मुलांना सूट मिळेल. दुचाकी, आपात्कालीन सेवा देणारी वाहने म्हणजे एम्ब्युलन्स, अग्निशामक दलाचा या योजनेत समावश करण्यात आलेला नाही.
राजधानी दिल्लीत 70 लाख दुचाकी वाहनांना सूट देण्यात आलेली आहे. यावेळी सीएनजी कारला सूट देण्यात आलेली नाही. त्यामुळे सार्वजनिक वाहनांमध्ये गर्दी वाढण्याची शक्यता आहे. सरकारने दोन हजार अतिरिक्त बसची व्यवस्था केल्याचा दावा केला आहे. त्याचबरोबर मेट्रोच्या फेऱ्याही सम-विषमच्या काळात वाढवल्या जाणार आहेत.
दिल्लीत वाहनांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी दिल्ली सरकारने यापूर्वीही दोन वेळा सम-विषम योजना लागू केली आहे. वर्ष 2016 मध्ये 1 ते 15 जानेवारी आणि 16 ते 30 एप्रिल पर्यंत दोन वेळा सम-विषम योजना लागू करण्यात आली होती.